जम्मू – नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या अल्संख्याक विभागाच्या बैठकीत काश्मीरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करावे आणि काश्मिरी पंडितांनाही काश्मीर खोऱ्यात परतावे असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
या संबंधात संमत करण्यात आलेल्या ठरावात नमूद करण्यात आले आहे की, गेली तीन दशके या निर्वासितांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यांनी काश्मीर खोऱ्यात परत यावे आणि त्यांचे येथे सन्मानाने पुनर्वसन होण्याची गरज आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अनिल धर यांनी या संबंधातील ठराव मांडताना काश्मीर पंडितांच्या व्यथाही कथन केल्या. फक्त नॅशनल कॉन्फरन्स हा पक्षच काश्मीरी पंडितांचे येथे यशस्वी पुनर्वसन करू शकतो असे ते म्हणाले.
याच पक्षाने काश्मीर पंडितांना पुरेसे राजकीय प्रतिनिधीत्व सुरुवातीपासूनच दिले आहे असे त्यांनी नमूद केले. या बैठकीला मोठ्या प्रमाणावर काश्मीरी पंडित उपस्थित होते. त्यावरून या घटकाचा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला पाठिंबा नाहीं हा दावा खोटा ठरतो, असे या पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम. के. योगी यांनी सांगितले.