Dehu News – श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने उत्साहात झाली. दररोज काकडा आरती, अभिषेक व महापूजा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण, युवा कीर्तनकारांची कीर्तनसेवा, सायंकाळी ह.भ.प. छोटे माऊली महाराज कदम यांची संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्रावर कथा आणि रात्री जागर असा अखंड हरिनामाचा सोहळा संपन्न झाला. पारायणाची सांगता झाल्यानंतर मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वाचक भाविकांनी आपल्या डोक्यावर ज्ञानेश्वरी व गाथा घेऊन श्री विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या पादुकांना प्रदक्षिणा घातली. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या ध्वजस्तंभाभोवती रिंगण करीत ज्ञानोबा-तुकोबा असा जयघोष करण्यात आला. या वेळी महिला भाविकांनी फुगड्या खेळल्या, तर पुरुष भाविकांनी एकमेकांची गळाभेट घेत पुढील वर्षीही या पारायणात सहभागी होण्याचा संकल्प केला.संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी जयंती व तपोनिधी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्रकाट्य वर्षानिमित्त ह.भ.प. छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी उपस्थित भाविकांच्या वतीने दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच भंडारा डोंगरावर साकारत असलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी माहिती देत भाविकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.