Pune District : ‘डेडलाइन’ संपली, समस्या नाही; चाकण एमआयडीसीची स्थिती : रस्ते अर्धवट, कचऱ्याचे ढीग कायम!
Pune District : मुदत संपली, तरी समस्या संपल्या नाहीत; त्यामुळे प्रशासनाच्या डेडलाइनच्या अंमलबजावणीवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

चाकण : ३१ ऑगस्टची डेडलाइन संपली; पण चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कोंडी संपली नाही! प्रशासनाने दिलेली मुदत उलटून गेल्यानंतरही अनेक रस्त्यांची कामे अर्धवटच आहेत. अतिक्रमणे हटली, पण त्यानंतरचे डांबरीकरण रखडले. वीजकामांना वेग आला, पण रस्त्यालगतचे पोल कायम आहेत. खड्डे आणि अरुंद मार्गांमुळे वाहनांची कोंडी सुरूच आहे. त्यातच रस्त्यांच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिक आणि कामगारांच्या त्रासात भर पडली आहे. मुदत संपली, तरी समस्या संपल्या नाहीत; त्यामुळे प्रशासनाच्या डेडलाइनच्या अंमलबजावणीवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. विविध विभागांना कामांना गती देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर रस्ते, अतिक्रमण आणि वीजकामांना वेग आला. मात्र, प्रत्यक्ष स्थिती पाहता अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तळेगाव-चाकण, शिक्रापूर-चाकण, भोसरी-चाकण, मोई-चाकण आणि राजगुरूनगर मार्गांवरील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यांच्या कडेला असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्ता मोकळा झाला आहे.
मात्र, मोकळ्या जागेवर डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे वाढीव रस्ता वाहतुकीसाठी उपयोगात आलेला नाही. याचा फटका दररोज हजारो वाहनांना बसत आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागतात. अवजड वाहनांमुळे कोंडी अधिकच वाढते. कामाच्या ठिकाणी वाहतूक नियोजनाचा अभाव जाणवतो. तळेगाव-चाकण मार्गावरील खालुंब्रे आणि महाळुंगे परिसरात काँक्रिटीकरण सुरू आहे. महाळुंगे येथे बसविण्यात आलेले प्री-कास्ट पॅनेल्स काही ठिकाणी समतल नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वाहनांना धक्के बसत आहेत. दुचाकीस्वारांसाठी हा प्रवास धोकादायक ठरत आहे. आळंदी फाटा ते निघोजे मार्गावरील कामही अपूर्ण आहे. काही ठिकाणी एकाच लेनवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. चिखली ते मोई या मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नसल्याने परिस्थिती आणखी बिकट आहे. अवजड वाहनांची मोठी वर्दळ या मार्गावर असते. त्यामुळे कोंडीचा फटका उद्योगातील कामगारांनाही बसतो.
रस्त्यांची कामे सुरू झाली. मात्र, कचऱ्याचा प्रश्न प्रशासनाच्या अजेंड्यावरून गायब झाल्याचे चित्र आहे. मोशी ते चाकण, खालुंब्रे, निघोजे आणि खराबवाडी परिसरात रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्यास आहेत. अनेक कामगार शिफ्टमध्ये काम करतात. कचरा संकलनाची वेळ आणि कामगारांच्या शिफ्टची वेळ जुळत नाही. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी पर्याय उरत नाही. परिणामी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. औद्योगिक परिसराच्या प्रतिमेलाही याचा फटका बसत आहे. कायमस्वरूपी कचरा संकलन व्यवस्था उभारण्याची मागणी होत आहे.
चाकण एमआयडीसी फेज-१ आणि इतर टप्प्यांमध्ये महावितरणकडून उच्चदाब वीजवाहिन्यांची कामे सुरू आहेत. वाढत्या उद्योगांची वीज गरज पाहता नवीन सब-स्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर काही ठिकाणी स्ट्रीट लाइटचे पोल अद्याप रस्त्यालगत उभे आहेत. हे पोल हटविले नाहीत तर मोकळ्या जागेचा पुन्हा पार्किंगसाठी वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करण्याची गरज आहे.
चाकण एमआयडीसीतील प्रश्न सोडविण्यासाठी कामांना वेग आला आहे. काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, ३१ ऑगस्टची मुदत संपली आहे. ही मुदत पाळली नाही तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. आता मुदत उलटूनही कामे अपूर्ण असल्याने पुढील कारवाई काय होणार, हा प्रश्न आहे. उद्योगांना केवळ आश्वासन नको. प्रत्यक्ष सुविधा वेळेत मिळणे गरजेचे आहे.
– दिलीप बटवाल, सीईओ, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजया भागात मोठ्या संख्येने कामगार राहतात. त्यांच्या शिफ्टच्या वेळेनुसार कचरा संकलन होत नाही. त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकला जातो. प्रशासनाने ठराविक वेळेत कचरा संकलन करावे. ठिकठिकाणी डस्टबिन ठेवावेत. स्वच्छतेचा प्रश्न तातडीने सोडवावा.
– लखीमचंद ओसवाल, स्थानिक व्यापारी, चाकण





