IND vs ENG 2nd Test : आर. अश्विन इंग्लंडविरुद्ध रचू शकतो विक्रमांची मालिका; या ‘5’ मोठ्या रेकॉर्डच्या आहे उंबरठ्यावर…

IND Vs ENG 2nd Test Match, Ravi Ashwin Stats & Records : हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात रवी अश्विनने उत्कृष्ट गोलंदाजी सादर केली. रवी अश्विनने हैदराबाद कसोटीत 6 विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी, ताज्या आयसीसी क्रमवारीत, रवी अश्विन कसोटीतील नंबर-1 गोलंदाज कायम आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. विशाखापट्टणम येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
हे रेकॉर्ड असतील रवी अश्विनच्या निशाण्यावर ..
1. भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रविचंद्रन अश्विन दुसऱ्या कसोटीत मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. त्याला आपले पाचशे कसोटी बळी पूर्ण करण्यासाठी केवळ 4 बळींची आवशक्यता आहे. त्याचबरोबर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 500 बळी घेणारा दुसराच गोलंदाज ठरेल. या बाबतीत तो अनिल कुंबळेला मागे टाकेल. कुंबळने 105 कसोटीत 500 बळी घेतले आहेत. अश्विन ही कामगिरी 97 व्या कसोटीतच करु शकेल. कसोटीत सर्वात जलद 500 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने केवळ 87 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती.
2. अश्विनने या कसोटीत दोन बळी घेतले तर तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंडविरूद्ध 23 सामन्यात 95 बळी घेतले होते. तर अश्विनने 20 कसोटीत 94 बळी घेतले आहेत.
3. अश्विनने दुसऱ्या कसोटीत सहा बळी मिळवले तर तो भारत – इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा भारताचा पहिला आणि दोन्ही देशांमधील केवळ दुसराच गोलंदाज ठरेल. यापूर्वी जेम्स अँडरसनने भारताविरूद्ध कसोटीत 100 बळींचा पल्ला पार केला आहे. त्याने 35 सामन्यात 139 बळी घेतले आहेत.
4. आर अश्विनने आतापर्यंत 96 कसोटी सामन्यांमध्ये डावात 34 वेळा पाच बळी (Five-wicket hauls)घेण्याची कामगिरी केली आहे. जर तो दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात पाच-पाच बळी घेण्यात यशस्वी ठरला तर तो अनिल कुंबळेला मागे टाकेल. कुंबळेने कसोटीत भारतासाठी 35 वेळा पाच बळी (Five-wicket hauls)घेण्याची कामगिरी केली आहे.
5. भारतीय भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. अनिल कुंबळेने 350 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 56 कसोटी सामन्यांमध्ये 343 विकेट घेतल्या आहेत. अश्विन फक्त 8 विकेट्स घेऊन कुंबळेला मागे टाकेल.





