नवी दिल्ली – भाजपने रविवारी संकल्प सत्याग्रह करणाऱ्या कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. तो सत्याग्रह महात्मा गांधी यांचा अवमान करणारा आहे. समाजहितासाठी गांधीजी सत्याग्रह करायचे. त्याउलट, कॉंग्रेसचा तथाकथित सत्याग्रह व्यक्तिगत कारणांसाठी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या निकालामुळे राहुल आपोआप लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले. त्यामुळे सत्याग्रह कशासाठी केला जात आहे?
कॉंग्रेसच्या सत्याग्रहाचा सत्यासाठी लढण्याशी कुठलाही संबंध नाही. त्या पक्षाचे आंदोलन एकप्रकारे राज्यघटना आणि न्यायालयाच्या निकालाविरोधात आहे. त्यातून कॉंग्रेसचा अहंकारच उघड होतो, असे त्यांनी म्हटले.