मालेगाव(नाशिक) :- ‘आता जिंकेपर्यंत लढायचं..’ असा नवीन नारा उद्धव ठाकरे यांनी मालेगावतील शिवगर्जना सभेतून दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. तसेच निवडणूक आयोगावर देखील टीका केली आहे. तसेच राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान करू नये, असं स्पष्टपणे सांगितलयं. तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. तसेच ही लढाई उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर लोकशाही वाचविण्यासाठी आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे.
उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
आता जिंकेपर्यंत लढायचेय…
आजच्या या सभेचं काय वर्णन करायचं 15 दिवसांपूर्वी एक खेडला सभा होती, अभुतपूर्व गर्दी होती. आजची सभा आणखी अथांग पसरली आहे. संजय राऊत आपण म्हणालात, ते बरोबर आहे, आज आपलं नाव चोरलं , धनुष्यबाण चोरला आहे. माझ्या हातात काहीही नाही तरिही इतकी गर्दी. ही पूर्वजांची पुण्याई आणि आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे. . मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. तुमच्या कष्टासाठी लढतोय. तुमच्या प्रश्नासाठी लढत आहे. आता जिंकेपर्यंत लढायचेय. असा नवीन नारा उद्धव ठाकरे यांनी मालेगावतील शिवगर्जना सभेतून दिला आहे.
गद्दार आणि ढेकणाला चिरडायला तोफेची गरज नाही
नाव चोरले, धनुष्यबाण चोरलं… पण ही जीवाभावाची माणसे, प्रेम करणारी माणसे चोरू शकत नाहीत. प्रेम करणारी माणसे विकत घेता येत नाहीत. मुख्यमंत्रीपद येते आणि जाते… पण हे प्रेम कायम राहते.. हे प्रेम गद्दारांच्या नशीबात नसते. लोकांनी भरभरून प्रेम दिलं हे गद्दारांना लाभणार नाही. ही गर्दी भाड्याने आणता येत नाही. गद्दार आणि ढेकणाला चिरडायला तोफेची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत
जनतेच्या पाठिंब्यावर आपण लढण्यासाठी तयार आहोत, आता सर्वांची साथ महत्त्वाची आहे. शिवधनुष्य पेलताना रावण उताणा पडला तर तिथे मिंधे कसे टिकणार, तेही उताणे पडणार. ही एवढी शक्ती एकवटली तर ते आपले स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. ही लढाई आपल्या देशाची आहे, लोकशाहीची आहे, शेतकऱ्यांची आहे, त्यात तुम्ही सोबत आहात का? 2024 मध्ये निवडणुकीत तुम्ही त्यांना सत्तेवर बसवले, तर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
निवडणूक आयोगावर टीका
ही आमची शिवसेना आहे, आम्ही शिवसेनाच म्हणणार, ही माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांवची सभा बघा. प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दिली ती काय रद्दी होती? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली. त्यांनी मागितलेले प्रतिज्ञापत्र आणि सदस्यपत्रे आपण त्यांना दिलेली आहे.
त्यानंतर शिवसेना कोणाची या निर्णय त्यांनी द्यावा.
सुहास कांदेंना टोला
तुमच्याकडे किती कांदा शेतकरी आहे, कांद्याला भाव मिळाला का? कांदा खरेदी झाली नाही. एका कांद्याची खरेदी झाली. कांद्याला भाव मिळाला नाही असे तुम्ही म्हणता, पण मी म्हणतो कांदा खरेदी झाली एक कांदा 50 खोक्याला विकला गेला. असं म्हणत उध्दव ठाकरेंनी शिवसेना(शिंदे गट) आमदार सुहास कांदेंना टोला लगावला. पुढे ते म्हणाले, मग तुमच्या कांद्याला किती भाव मिळाला पाहिजे होता. तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे.
बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष….
भाजपने कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलय. परवाच भाजप आमदार वॉशिंग पावडर बद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेला पक्ष असे नाव ठेवा. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कस हे सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही.
बावनकुळे तुमच्या नावाएवढ्या 52 जागा तरी द्या….
तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील म्हणाले हे सत्तांतर आम्ही हृदयावर दगड ठेवून हे स्वीकारले आहे. आताचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात आम्ही मिंधे गटाला 48 जागाच देणार. निदान तुमच्या नावएवढ्या जागा तरी त्यांना द्या.तुमच्यासाठी जिवंत माणसांचं त्याग करून तुमच्यासोबत आले, त्यांना 48 जागांमध्ये आटोपणार आहात का? असा टोला ही उद्धव ठाकरेंनी लगावला. भाजपने जाहीर करावे मिंधेंना नेते म्हणून निवडणुक लढणार का? तुमचे 52 काय 152 कुळे खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करणे शक्य नाही. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुक लढवा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो. तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा, मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो, बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे पण निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा.
सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला आहे. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण, आम्ही सावरकर यांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला.