सोलापूर (प्रतिनिधी) – सभागृहात सावरकरांच्या विरोधात बोलत असताना आम्हाला मूग गिळून गप्प बसावे लागत होते. जे शिवसेनेचे आमदार निवडून आले, त्यांच्या विरोधात पराभूत झालेल्या घटक पक्षातील उमेदवाराला ताकद देत होते. अडीच वर्षात शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्यात आले. परिणामी, निवडणुकीत आपल्या शिवसेनेच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले असते. त्यामुळे शिवसेनेचे अस्तित्व टिकविण्यासाठी छातीवर दगड ठेवून जड अंतकरणाने आपण भाजपसोबत जाण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पंढरपुर येथे शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले.
विधिमंडळ सचिवांची शिवसेनेच्या 53 आमदारांना नोटीस; शिवसेना व शिंदे गटाला धक्का…
एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करूनच टीकाकारांना उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद करणार आहोत. स्वतंत्र गटाची लढाई सोपी नव्हती. आमदार फोडण्यासाठी खूप प्रयत्न झाले. परंतु आमदारांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आपण सार्थ करून दाखविला. एकनाथ शिंदे कोणालाही तोशिश लागू देणार नाही, असा शब्द आपण सर्व आमदारांना दिला होता. मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने मिळालेल्या संधीचे सोने आपण सामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देऊन करणार आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण आपल्या पदाच्या माध्यमातून न्याय देणार आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आमदारांचे बंड म्हणजे ऐतिहासिक घटना असून जगातील 33 देशांनी या ऐतिहासिक घटनेची नोंद घेतली आहे. म्हणून एक विचारांची लढाई लढत आहोत. बाळासाहेबांचे आणि तेजस्वी हिंदुत्वाचे विचार आणि ज्यांच्या पठडीत आपण तयार झालो ते धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आज आपण मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर उभा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शंकरराव गडाख सेनेला बाय…बाय…करुन शिंदे सरकारमध्ये सामील होणार?
तीन नगरसेवक शिंदे गटात सामील
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकापाठोपाठ धक्के बसत आहेत. सोलापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरात सोलापूर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल आणि नगरसेवक गायकवाड यांनी सेनेला “जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी यासाठी आपली ताकद पणाला लावली असल्याने आणखी मोठे नेते गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.