Champions Trophy 2025 : भारत-न्यूझीलंड फायनल सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोण विजेता ठरणार? जाणून घ्या आयसीसीचा नियम

Champions Trophy 2025 final IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना रविवारी दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांचे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या हंगामात, दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर असणार आहेत. दोघांमधील गट टप्प्यातील सामन्यात भारताने ४४ धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही संघ अंतिम सामना खेळण्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत संघा ट्रॉफीवर नाव कोरणार? चला तर मग जाणून घेऊया.
काय आहे आयसीसीचा नियम?
क्रिकेटमध्ये असे अनेक वेळा पाहिले गेले आहे की, पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. या समस्येला तोंड देण्यासाठी, बाद फेरीतील सामन्यांमध्ये अनेकदा राखीव दिवस ठेवला जातो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर ९ मार्च रोजी पावसामुळे सामना रद्द झाला, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना होता तिथून पुढे सुरू होणार नाही. सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे १० मार्च रोजी पुन्हा सुरू होईल, जेणेकरून दोन्ही संघांना बरोबरीची संधी मिळेल.
२००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंकेने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. त्या काळात दोन्ही दिवशी सामना खेळवता आला नाही. त्यानंतर आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. जर पाऊस पडला तर यावेळीही असेच काहीसे घडेल. आयसीसीच्या मते अंतिम सामना पूर्ण झाला पाहिजे. जर असे झाले नाही तर संयुक्त विजेते घोषित केले जातील. येथे निर्णय आधी खेळलेल्या सामन्यांच्या आधारे घेतला जाणार नाही. सामन्याच्या दिवशी जो संघ अधिक मजबूत असल्याचे सिद्ध करेल तो जिंकेल.
२५ वर्षांनंतर भारत-न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आमनेसामने –
भारत आणि न्यूझीलंड आतापर्यंत ११९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने ६१ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंड संघाने ५० सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. सात सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना अनिर्णित राहिला. २००० मध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली होती. यानंतर, आता, म्हणजे सुमारे २५ वर्षांनंतर, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे या हंगामात भारताने एकही सामना गमावला नाही. न्यूझीलंडही मजबूत असून त्यांना फक्त भारताविरुद्धचं पराभव पत्करावा लागला होता.
अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे का?
दुबईतील अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नसल्याचे अॅक्यूवेदरच्या अहवालात म्हटले आहे. सामन्याच्या दिवशी आकाश निरभ्र राहील आणि तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. सामन्यादरम्यान चाहत्यांना उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्यादरम्यान पाऊस खलनायक बनणार नाही अशी अपेक्षा आहे.





