दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरणावरून केंद्र सरकार, रेल्वे विरोधकांच्या निशाण्यावर; रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून राजकारण तापले. त्यातून केंद्र सरकार आणि रेल्वे विभाग विरोधकांच्या निशाण्यावर आले. रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली. महाकुंभ मेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर योग्य व्यवस्था ठेवायला हवी. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतून पुन्हा रेल्वेचे अपयश आणि केंद्र सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित झाली.
गैरव्यवस्थापन आणि दुर्लक्षामुळे कुणी जीव गमावणार नाही याची निश्चिती सरकार, प्रशासनाने करायला हवी, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. मृतांच्या आकडेवारीबाबत सत्य दडवण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. ती बाब लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. मृतांची आणि जखमींची संख्या लवकरात लवकर जाहीर केली जावी.
बेपत्ता झालेल्यांविषयीही माहिती दिली जावी, अशी मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. दुर्घटनेतील जीवितहानीची नैतिक जबाबदारी स्वीकारून वैष्णव यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. राजीनामा न दिल्यास वैष्णव यांची गैरव्यवस्थापनाबद्दल पदावरून हकालपट्टी व्हावी, अशी आक्रमक भूमिका कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मांडली. तृणमूल कॉंग्रेसनेही वैष्णव यांना रेल्वे मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली. दुर्घटनेशी संबंधित सत्य दडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप आपने केला.




