नवी दिल्ली – मणिपूरमध्ये 46 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कथित 10 दहशतवाद्यांना पकडण्यासाठी त्यांची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस जाहीर केले आहे. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी आणि चार जवान शहीद झाले होते. शिवाय, कर्नल त्रिपाठी यांची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता.
एनआयएने पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंट (एमएनपीएफ) च्या 10 वॉंटेड दहशतवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात या दहशतवाद्यांनी भारत-म्यानमार मार्गावर 46 आसाम रायफल्सच्या जवानांवर प्राणघातक हल्ला केला होता.
या प्रकरणाची दखल घेत एनआयएने स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दोन दहशतवाद्यांवर प्रत्येकी आठ लाख रुपये, एकावर सहा, तर अन्य सात जणांवर प्रत्येकी चार लाख रुपयांचा इनाम जाहीर केला आहे.