अहमदाबाद विमान अपघातः ब्लॅकबॉक्स, डीव्हीआर सापडले, आत्तापर्यंत २६५ मृतदेहांची नोंद, 7 जणांची ओळख पटली

अहमदाबाद- एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ अपघाताच्या २७ तासांनंतर, शुक्रवारी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ने ब्लॅक बॉक्स जप्त केला. तो वसतिगृहाच्या छतावर सापडला. यासह, एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरातच्या एटीएसने डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) ताब्यात घेतला आहे. याद्वारे अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडले हे कळू शकणार आहे.
कोणत्याही विमानाच्या अपघातांचे कारण शोधण्यासाठी डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्स ही दोन उपकरणे महत्त्वाची असतात.
एअर इंडियाच्या विमानात १२ क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. यातून एका प्रवाशाचे प्राण वाचले. मृतांमध्ये राजस्थानमधील १३, मध्यप्रदेश, हरियाणा आणि बिहारमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतांच्या नातेवाईकांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे.
बचाव पथकाने २६५ लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यापैकी ७ जणांचे मृतदेह डीएनए चाचणीनंतर त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. मृतांमध्ये २४१ जण विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमान कोसळलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील ५ मृत आहेत. अपघाताच्या वेळी वसतिगृहात ५० हून अधिक लोक उपस्थित होते.
डीव्हीआर अन् ब्लॅक बॉक्समध्ये फरक काय?
डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्स डेटा रेकॉर्ड करण्याचे काम करतात. डीव्हीआर सामान्यपणे सुरक्षा कॅमेऱ्यांनी फ्लाईटचा व्हिडीओ रेकॉर्ड करतो. तर ब्लॅक बॉक्स फ्लाईट डेटा आणि कॉकपिटमधील ऑडिओ रेकॉर्ड करतो. डीव्हीआर निगराणीच्या हेतूने सुरक्षा कॅमेऱ्यांनी व्हिडीओ फुटेज रेकॉर्ड करतो. डीव्हीआरमध्ये रेकॉर्ड होणारा व्हिडीओ डेटा साधारणत: हार्ड ड्राईव्ह किंवा क्लाउड स्टोरेजवर जमा होतो. तो तिथेच साठवला जातो.
राजकोटमधील ६५० शाळा उद्या बंद-
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकोट शहरातील खासगी शाळा व्यवस्थापन मंडळाने शनिवारी ६५० शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, राजकोट महानगरपालिकेच्या ९० शाळा देखील बंद राहतील.
हा इतिहासातील सर्वात काळा दिवस- टाटा ग्रुप –
एकाच वेळी इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला हे अकल्पनीय आहे. टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. भारत, अमेरिका आणि ब्रिटनच्या तपास संस्थांना पूर्ण सहकार्य केले जात आहे आणि आम्ही पूर्ण पारदर्शकता राखू. जेव्हा आम्ही एअर इंडिया ताब्यात घेतली तेव्हा प्रवाशांची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता होती, अशी प्रतिक्रीया टाटा समुहाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
विमानात आधीच त्रुटी होत्या; महिला प्रवाशाचा दावा –
लंडनहून अहमदाबादला आलेल्या सुरतच्या हिनाबेन कलारिया यांनी सांगितले की, विमानात अनेक तांत्रिक त्रुटी होत्या. त्यांच्या मते, उड्डाणादरम्यान एसी आणि सर्व डिस्प्ले बंद होते. एअर होस्टेसने याला तांत्रिक बिघाड म्हटले. विमान उतरताना विमानातून एक मोठा आवाज येत होता, ज्यामुळे प्रवासी घाबरले. अपघाताच्या दीड तास आधी हिनाबेन त्याच विमानातून सुरक्षितपणे उतरल्या होत्या.
४ वैद्यकीय विद्यार्थी व एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू –
गुजरात आयएमएचे अध्यक्ष डॉ. मेहुल शाह म्हणाले की, अपघातात ४ वैद्यकीय विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, तर ४५ हून अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृहातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. १०० हून अधिक डॉक्टर मदत कार्यात गुंतले आहेत. ते सरकारच्या सतत संपर्कात आहेत.
या ७ एजन्सींकडून तपास –
– नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (एनएआय)
– गुजरात पोलिस
– एयरक्राफ्ट ॲक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्यूरो (एएआयबी)
– डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिविल एविएशन (डीजीसीए)
– यूनाइटेड किंगडम एअर ॲक्सीडेंट्स इन्व्हेस्टीगेशन ब्रांच (युके-एएआयबी)
– यूनाइटेड स्टेट्स नॅशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी)
– फेडरल एविएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए)




