अकोलेत एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीसह भाजपला ‘जोर का झटका’; अनेक दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार?

अकोले : अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारूती मेंगाळ यांच्या समवेत भाजपा, राष्ट्रवादी व कॉग्रेससह इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने तालुक्यात राष्ट्रवादी, भाजपाला खिंडार पाडत शिवसेना भक्कम होणार असल्याची चर्चा आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे युवा नेतृत्व व पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन येत्या काही दिवसात शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
यावेळी मेंगाळ यांनी तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचे सरपंच, काही पंचायत समिती सदस्य, तसेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तालुक्यातील काही सहकारी संस्थाचे संचालक यांची यादीच एकनाथ शिंदे यांना दिलेली आहे. येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी ठाणे येथे हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा असल्याची खात्री लायक माहिती आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत हा प्रवेश सोहळा झाल्यास तालुक्यातील मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे. मारुती मेंगाळ हे तालुक्यातील आदिवासी भागातील ठाकर समाजाचे नेतृत्व असले तरी त्यांची बहुजन समाजावरही छाप असल्याने बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे कायम उभा राहत असतो. ते अकोले पंचायत समितीचे उपसभापती असताना उल्लेखनीय काम केले असल्याने उपसभापती नावानेच त्याची ओळख झाली आहे.
विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यान प्रभावित होऊन शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मातब्बर नेते, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचे सरपंच, काही पंचायत समितीचे सदस्य हे आपले सोबत येत्या शनिवारी ठाणे येथे पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर तालुक्यात शिवसेनेची ताकद निश्चित वाढणार आहे.
अकोले तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका येत्या काळात होण्याची शक्यता असताना भाजप, राष्ट्रवादीसह इतर पक्षांना खिंडार पाडत शिवसेनेत होणारे पक्ष प्रवेश तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचीत जमाती साठी राखीव असुन या जागेसाठी अकोले तालुक्यातुनच उमेदवार निवडला जाणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षाची वाढलेली ताकद कामी येणार आहे.





