नवी दिल्ली – अरूणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनी सैनिकांकडून भारतीय सैनिकांना मारहाणीच्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीन संतप्त प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी यांची त्यांच्या पक्षाने तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपने केली आहे.
“राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर…”, शरद पवार यांचा थेट इशारा
जर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे रिमोट कंट्रोलने चालत नसतील आणि विरोधी पक्ष जर देशासोबत उभा असेल तर राहुल गांधी यांची त्यांच्या वक्तव्याबाबत पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे. राहुल गांधी यांनी भारताचाच अपमान केला असून लष्कराचे मनौधैर्य खच्ची करण्याचे काम केले असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी केली.
दरम्यान, याच मुद्द्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की 1962 चे स्मरण करावे. तेव्हा देशाची काय स्थिती होती? तेव्हा चीनने आपला किती प्रदेश बळकावला. जेंव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेंव्हा छोटे छोटे देश भारताला घाबरवत होते. आज कोणीही आपल्याकडे डोळे वटारू शकत नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की राहुल गांधी यांचे वक्तव्य अत्यंत बालिशपणाचे, धरबंद नसलेले आणि राष्ट्रविरोधी तत्वांनी प्रेरीत असल्यासारखे आहे. हा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि भारतीय लष्कराचा अपमान करणारा आहे. कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्या या विचारांची आम्ही निंदा करतो. राहुल यांनी संपूर्ण देशाची आणि भारताच्या सैनिकांची माफी मागावी.
राहुल यांना लक्ष्य करताना गौरव भाटीया म्हणाले की असे दिसते की राहुल गांधी यांचा देशाच्या शत्रुंशी समझौता झाला आहे. जेंव्हा जेंव्हा भारतीय सैनिक पराक्रम करतील तेव्हा तेव्हा कॉंग्रेस त्यांचे मनौधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करेल असा करार झालेला दिसतो. गेल्या आठ वर्षांत भारताच्या 1 इंच भूमीवरही कोणी कब्जा केलेला नाही.