मुंबई – महात्मा फुलेंनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. अशा व्यक्तीबाबत टिंगल-टवाळी राज्यपालांकडून होत असेल, तर राज्यपाल म्हणून त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आज लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्याचं प्रतीक आज इथे दिसतंय, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपला ठणकावून सांगितले आहे.
हा तर नॅनो मोर्चा, संख्येवरून लगेच कळतंय – देवेंद्र फडणवीस
यावेळी बोलताना शरद म्हणाले की, “हे खरं आहे की आजचा मोर्चा एक वेगळी स्थिती दाखवतो. ७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर मुंबईत लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं, यासाठी हौतात्म्य पत्करायला अनेक तरुण पुढे आले. शेवटी महाराष्ट्र पदरात पडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रात बाहेरचे मराठी भाषिक येण्याचा आग्रह करत आहेत. बेळगाव, निपाणी, कारवार किंवा अन्य भागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी त्यांच्या भावनेशी राज्यातला मराठी माणूस सहभागी आहे.”
त्याचबरोबर मोर्चात जमलेल्या गर्दीकडे इशारा करत शरद पवार यांनी म्हटले की,”या इशाऱ्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर लोकशाहीच्या मैदानात त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, याबद्दलची खात्री मला आहे. या राज्यकर्त्यांमध्ये कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाली आहे. एका मंत्र्याने उल्लेख केला की शिक्षणासाठी मदत मागितली तर त्याला भीक मागितली असं म्हणाले. तिथे महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केला.”
तसेच त्यांनी बोलताना राज्यपालांविरोधात चांगलाच आक्रमक पवित्र घेतला. ते म्हणाले की,”महाराष्ट्राच्या इतिहासात असा गव्हर्नर कधी पाहिला नाही. मी स्वत: राज्याच्या विधानभवनात जाऊन ५५ वर्षं झाली. या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम यांनी केलं. पण यावेळी राज्याच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम होत आहे. महात्मा फुले, सावित्रीबाईंबद्दल लाजिरवाणे उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे.”