Pune District : खरोशीतील विद्यार्थ्यांना सायकलींचा आधार
Pune District : अॅड. सुरेशभाऊ कौदरे युवा मंच, खरोशीचे तसेच माजी सरपंच भोलेनाथ कौदरे यांच्या प्रयत्नातून आणि योगेश गोंधळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

राजगुरुनगर : ग्रामीण आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारी अडचण लक्षात घेऊन खरोशी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अस्तित्व कलामंच सेवाभावी फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्यातून सायकलींचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दळणवळणाची अडचण अडथळा ठरू नये, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.
अॅड. सुरेशभाऊ कौदरे युवा मंच, खरोशीचे तसेच माजी सरपंच भोलेनाथ कौदरे यांच्या प्रयत्नातून आणि योगेश गोंधळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. पुणे शहरातील विविध सोसायट्या व इमारतींमध्ये राहणार्या नागरिकांच्या मुलांनी वापरलेल्या तसेच किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या सायकली संकलित करून त्यांची दुरुस्ती करण्यात येते. त्यानंतर या सायकली ग्रामीण, आदिवासी व डोंगराळ भागातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि दळणवळणाची अडचण निर्माण होते. विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. शिक्षणाबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
अस्तित्व कलामंच सेवाभावी फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कातकरी समाजातील नागरिकांना उबदार ब्लँकेट आणि साड्यांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची गोडी लागावी आणि शिक्षणाच्या प्रवासातील अडचणी कमी व्हाव्यात, या उद्देशाने सायकल वितरणाचा उपक्रम पुढे नेला जात आहे.
यावेळी खरोशीच्या सरपंच रोहिणी लांघी, माजी सरपंच भोलेनाथ कौदरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कौदरे, उपाध्यक्ष विजय कौदरे, मुख्याध्यापक सुदाम सुपे, शिक्षक अजिंक्य जैद, अस्तित्व कलामंच फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश गोंधळे, अश्विनी शेंडे, श्रुतिका चौधरी, खेड तालुका धर्म जागरण प्रमुख नितीन कौदरे, माजी मुख्याध्यापक गिरिधर सुरकुले, एन. डी. खाडे, सुषमा भोये, ग्रामविकास अधिकारी रुपाली कड, ज्येष्ठ ग्रामस्थ देवराम पांडे, श्रावण पाटोळे, माजी ग्रामपंचायत सदस्या सविंद्रा गुंजाळ तसेच संस्थेचे सहकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुदाम सुपे यांनी केले. शिक्षक अजिंक्य जैद यांनी उपस्थितांचे आभार मानले.





