बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात ठेवला; रामदास कदम यांचा खळबळजनक दावा: संजय राऊतांनी थेट ठणकावून सांगितलं

Sanjay Raut : शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी विविध मुद्यावर भाष्य करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. याच मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केला आहे. आता या आरोपावर उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते, हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा आरोप खळबळजनक रामदास कदम यांनी केला होता. आता या आरोपावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आता यांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं असेल भीतीपोटी आणि ते आता बोलत असतील तर काय करणार? असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटलं आहे. शिवसेनाप्रमुखांना आता शंभर वर्ष होत आहेत. ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला, आम्हाला मोठं केलं, त्यांच्याशी ही बेईमानी आहे, अशा शब्दांत राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले होते?
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत खळबळजनक माहिती दिली. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा, असं ते म्हणाले.
मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत असल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे. आज मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलले, असं रामदास कदम यांनी मेळाव्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना सांगितलं.





