पाच वर्षांत रखडलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याची संधी
पाटण (प्रतिनिधी) – पंचायत समितीला यापूर्वी भरीव निधी आम्ही आणायचो. मात्र गेल्या पाच वर्षांत मागील राज्य सरकारकडून एक पैसाही येथे आला नाही. पण आता चिंता करु नका. आपल्या विचारांची पंचायत समिती, जिल्हा परिषद ते आता राज्य शासनातही सत्ता आली आहे. या सत्तेच्या माध्यमातून नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांनी मतदार संघात रखडलेल्या विकासाचा अनुशेष भरुन काढा. कोणत्याही राजकीय परिस्थितीला तोंड देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आवाहन राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
पाटण पंचायत समिती सभापतीपदी राजाभाऊ शेलार व उपसभापतीपदी प्रतापराव देसाई यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ऍड. अविनाश जानुगडे, पाटण अर्बनचे चेअरमन दिनकरराव घाडगे, दिपकसिंह पाटणकर, माजी सभापती उज्ज्वला जाधव, राजाभाऊ काळे, सुभाषराव पवार उपस्थित होते.
पाटणकर म्हणाले, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मिळालेली संधी ही त्यांनी जनहितासाठी वापरावी. एकाच वेळी सर्वांना संधी देता येत नाही. त्यांचा भविष्यात निश्चितच विचार केला जाईल. विकासकामात सर्वांना विश्वासात घेऊन कामांचा समतोल राखा. असेही आवाहन केले.
सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले, मागील शासनाने पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला. त्यात आपला तालुका भरडला गेला. पण आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत रखडलेला विकास आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच भरुन काढू. येणाऱ्या सर्वच निवडणुकात आपल्या विचारांची सत्ता आणून जनतेची सेवा करा. सभापती राजाभाऊ शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. राजाभाऊ काळे यांनी स्वागत केले. प्रतापराव देसाई यांनी आभार केले.