Ashadi Wari: आषाढी वारीसाठी देहू नगरी सज्ज! ६१० पोलीस, ४० सीसीटीव्ही अन् १२०० फिरती शौचालये; देहूगावमध्ये तगडा बंदोबस्त
Ashadi Wari: देहू नगरपंचायतीकडून वारकऱ्यांसाठी चोख व्यवस्था; १२०० फिरती शौचालये, २२ पाण्याचे टँकर आणि महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम.

Ashadi Wari – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पालखी प्रस्थान सोहळ्यास अवघे काही तास शिल्लक असताना देहूगावमध्ये प्रशासनाची सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस, नगरपंचायत आणि आरोग्य विभागाने नियोजन केले असून बंदोबस्त, वाहतूक, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकारी आणि अंमलदारांची मार्गदर्शन बैठक देहूगाव येथील मंगल कार्यालयात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी भाविकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवणे, संशयास्पद वस्तू व वाहनांची तपासणी करणे, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय नियुक्त ठिकाण न सोडणे, ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी सूचना देणे, महिला वारकऱ्यांशी संवेदनशीलतेने वागणे तसेच स्वच्छ गणवेशात रेनकोटसह ड्युटीवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रविवार (दि. ५) ते बुधवार (दि. ८) या कालावधीत पालखी सोहळ्यासाठी २ पोलीस उपायुक्त, ४ सहाय्यक पोलीस आयुक्त, १४ पोलीस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ४०० पोलीस अंमलदार आणि १५० महिला-पुरुष गृहरक्षक दलाचे कर्मचारी असा सुमारे ६१० जणांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालखी मार्गावर ११ उंच निरीक्षण मनोरे उभारण्यात आले असून सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली.
देहू नगरपंचायतीनेही पालखी सोहळ्यासाठी व्यापक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुरक्षेसाठी ४० सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतेसाठी १२०० फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्यासाठी २२ टँकर, अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, प्रकाश व्यवस्था तसेच महिला भाविकांसाठी इंद्रायणी नदी परिसरात स्वतंत्र हिरकणी कक्ष आणि चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक दिंडीला प्रथमोपचार पेटी देण्यात येणार असून मदतीसाठी स्वतंत्र संपर्क कक्ष कार्यरत राहणार आहे.
आरोग्य विभागाकडूनही तयारी पुर्ण
मुख्य मंदिर, वैकुंठ गमन मंदिर, गाथा मंदिर, भैरवनाथ चौक, डिव्हाईन नेस्ट (परंडवाल चौक) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सहा आरोग्य पथके कार्यरत राहणार असून प्रत्येक ठिकाणी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. अन्नसुरक्षेसाठी चार तपासणी पथके नियुक्त करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिंडींसाठी ५०० प्रथमोपचार किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
“पालखी मार्गावरील खड्डे बुजविणे, दुतर्फा मुरूमीकरण, अनगडशहा दर्ग्याजवळ काँक्रिटीकरण, मेघडंबरीची रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता, औषध फवारणी आणि जलपर्णी काढण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पालखी प्रस्थानाच्या दिवशी नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी करू नयेत तसेच अतिक्रमण टाळून प्रशासनाला सहकार्य करावे.”
– चेतन कोंडे, मुख्याधिकारी






