Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी देहू नगरी सज्ज! संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नगरपंचायतीचं व्यापक नियोजन
Ashadhi Wari : श्री तुकाराम महाराज यांच्या ३४१व्या आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायतीची आढावा बैठक; स्वच्छता, पाणी आणि वीज पुरवठ्याचे चोख नियोजन.

Ashadhi Wari – जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या ३४१व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायतीने भाविक, वारकरी आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी व्यापक नियोजन हाती घेतले आहे. यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पालखी मार्ग, मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट आणि मुक्कामस्थळी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून नियमित जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. तसेच भाविकांसाठी तात्पुरती शौचालये, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि दिशादर्शक फलक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्ती, पथदिव्यांची दुरुस्ती तसेच अतिरिक्त ६० फ्लडलाईट्स बसवून संपूर्ण परिसरात अखंडित वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळीही वारकरी आणि भाविकांना सुरक्षित व सुलभ वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने पालखी मार्गावर आवश्यक ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात येणार असून सुमारे ५० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. सार्वजनिक ध्वनीप्रक्षेपण व्यवस्था तसेच २४ तास कार्यरत आपत्कालीन नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रशासन सज्ज राहणार आहे. आषाढी वारी पालखी सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा यासाठी नागरिक, वारकरी आणि सर्व संबंधितांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देहू नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.





