Ashadhi Wari: आळंदीत आषाढी वारीचा जय्यत तयारी! वारकऱ्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी २४ तास अखंड वीज, पाणीपुरवठा आणि जर्मन हँगरची व्यवस्था; उर्वरित प्रलंबित कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश.

Ashadhi Wari – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, वारकर्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. यासंदर्भात गुरुवारी आळंदी नगरपरिषदेत उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीला आमदार बाबाजी काळे, पोलीस उपायुक्त मारुती जगताप,
ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पालखी सोहळा प्रमुख ड. राजेंद्र उमाप, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, यात्रा समिती सभापती पूजा घुंडरे, नगरसेवक-नगरसेविका तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शहरात 1,800 मोबाईल शौचालये, 250 स्नानगृहे, 130 सीसीटीव्ही कॅमेरे, 110 अतिरिक्त फ्लडलाईट्स, दोन एनडीआरएफ पथके, वैद्यकीय सुविधा, एलईडी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण तसेच एसटी स्थानक आणि भैरवनाथ ट्रस्ट परिसरात जर्मन हँगर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आमदार बाबाजी काळे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून उर्वरित कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
वारकर्यांसाठी पुरेसा पाणीपुरवठा, अतिरिक्त वैद्यकीय सुविधा, कडक पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन तसेच खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासणी यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी गॅस पुरवठा करणार्या वाहनांना विशेष पास देण्याची व्यवस्था, अनधिकृत औषध वितरण रोखण्यासाठी दक्षता आणि सर्व अधिकारी-कर्मचार्यांनी ओळखपत्र वापरणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी पालखी मार्गावर अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था, इंद्रायणी नदीकाठावरील संरक्षण रेलिंगची कामे आणि इतर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी डी. डी. भोसले पाटील यांनी अतिक्रमण हटविणे, हॉकर्स झोन निश्चित करणे, धोकादायक झाडे व मोडकळीस आलेल्या इमारती हटविणे,
अन्न व औषध प्रशासनामार्फत नियमित तपासणी तसेच चाकण फाटा-आळंदी मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. बैठकीच्या शेवटी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी सर्व संबंधित विभागांना प्रलंबित कामे दोन दिवसांत पूर्ण करून आषाढी पालखी प्रस्थान सोहळा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यशस्वी करण्याचे निर्देश दिले.






