पुणे – प्रत्येक व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आपल्या घरासंबंधी काही विशेष आणि महत्त्वाच्या अशा गरजा असतात. याच बाबी ओळखून सुमारे २० वर्षांपूवी ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेत बांधकाम क्षेत्रांत नावाजलेल्या पुण्यातील परांजपे स्कीम्सने ‘अथश्री’ ही वैशिष्ट्यपूर्ण गृहसंकल्पना सादर केली. या संकल्पनेच्या यशानंतर नजीकच्या भविष्यात नागरिकांच्या घरांसंबंधीच्या विशेष गरजांची व्याप्ती लक्षात घेत त्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने परांजपे स्कीम्सच्या वतीने ‘स्पेशल प्रोजेक्टस डिव्हिजन’ची घोषणा आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. परांजपे स्कीम्सचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी ही घोषणा केली. परांजपे स्कीम्सच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख अमित परांजपे हे देखील यावेळी उपस्थित होते.
परांजपे स्कीम्सच्या या ‘स्पेशल प्रोजेक्टस डिव्हिजन’बद्दल अधिक माहिती देताना शशांक परांजपे म्हणाले, “घर हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय असतो. आयुष्यात वयाच्या अनेक टप्प्यांवर वेळोवेळी नागरिकांच्या घरांच्या गरजा आणि अपेक्षा या बदलत असतात. मुख्य बाब म्हणजे या अपेक्षा बदल्यानंतर घराचे डिझाईन, तेथे असणाऱ्या सुविधा, आवश्यक गोष्टी या ही बदलत असतात. हेच लक्षात घेत २० वर्षांपूर्वी परांजपे स्कीम्सने ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेत ‘अथश्री’ ही वैशिष्ट्यपूर्ण गृहसंकल्पना आणली. इथवर न थांबता त्याही पुढे जात ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेत ‘आस्था’ ही ‘असिस्टेड लिव्हिंग’ या तत्वावर आधारित संवेदनशील संकल्पना वास्तवात उतरविली. सध्या विशेष मुले व त्यांचे कुटुंबीय यांच्या गरजा लक्षात घेऊन ‘स्वनिकेतन’ ही गृहसंकुलांची निर्मिती आम्ही करीत असून अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच उपक्रम आहे. हे सर्व करत असताना नागरिकांच्या भविष्यातील घरांसंबंधीच्या विशेष गरजांची व्याप्ती लक्षात घेत आम्ही परांजपे स्कीम्समध्ये ‘स्पेशल प्रोजेक्टस डिव्हिजन’ सुरु करीत असून नजीकच्या भविष्यात या विभागा अंतर्गत विविध प्रकल्पांवर काम करण्याचा आमचा मानस आहे.”
नागरिकांच्या विशेष गरजांबद्ल बोलत असताना त्या केवळ घरांपुरत्या, सोईसुविधांपुरत्या मर्यादित राहत नाहीत. तर, या संदर्भात सतत संशोधन, सुधारणा करणे आणि पर्यायाने यासाठी एक परिसंस्था निर्माण करण्याची गरज आमच्या लक्षात आली असे सांगत शशांक परांजपे पुढे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक असो किंवा विशेष मुले यांसाठी प्रकल्प उभारत असताना प्रशिक्षित केअरगिव्हर हा घटक महत्त्वाचा आहे. त्यांचे प्रशिक्षण करण्यासाठीची संस्था, विशेष मुलांना सक्षम करणारी केंद्रे अशा अनेक गोष्टी करणे क्रमप्राप्त होणार आहे. या सर्वांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही हा विभाग सुरु करीत आहोत. याद्वारे जागतिक पातळीच्या सोयीसुविधा, भारतीय संस्कृती आणि वातावरणाला साजेशा पद्धतीने तयार करण्यावर आमचा भर असेल.” हे सर्व काम एकाच विभागाअंतर्गत व्हावे याबरोबरच इतर बांधकाम विकासकांना देखील दिशा आणि प्रोत्साहन मिळावे असा आमचा विचार आहे, असेही शशांक परांजपे म्हणाले.
या विभागाच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती देताना अमित परांजपे म्हणाले, “इमारत उभी राहिली म्हणजे प्रकल्प पूर्ण झाला, असे परांजपे स्कीम्समध्ये होत नाही. ग्राहकांशी असलेले आमचे नाते हे पुढील अनेक वर्षांचे असते. आमचा हाच स्वभाव लक्षात घेत ज्येष्ठ नागरिकांसाठीचे अथश्री, आस्था असो वा स्वनिकेतन या प्रकल्पांमध्ये आमचा सहभाग १०० टक्के असतो. या ठिकाणी प्रकल्पाचे डिझाईन, व्यवस्थापन, त्या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा आमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार असतील हे आम्ही कटाक्षाने पाळतो. अथश्री, आस्था आणि स्वनिकेतन या ठिकाणी आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, हे आमचे महत्त्वाचे काम आहे. या गोष्टी करीत असताना हे सर्व एकाच छताखाली असावे व यात सुसूत्रता यावी हा आमचा उद्देश आहे.” नजीकच्या काळात अशाच अनेक भविष्यवेधी संकल्पना ग्राहकांसाठी आम्ही घेऊन येऊ, असेही अमित परांजपे म्हणाले.
गृहनिर्माण क्षेत्रात एक भविष्यवेधी संकल्पना म्हणून विशेष मुले व त्यांचे कुटुंबीय यांच्या गरजा लक्षात घेत परांजपे स्कीम्सने ‘स्वनिकेतन’ या गृहसंकुलांची संकल्पना हाती घेतली असून अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच उपक्रम असेल. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, इंटलेक्च्युअल डिसॅबीलिटीज् (बौद्धिक अक्षमता), सेरेब्रल पाल्सी आणि डाऊन सिंड्रोम यांसारख्या परिस्थितीचा सामना करणारी मुले आणि विशेषत: त्यांचे पालक यांना दररोजच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या मुलांचे पालन-पोषण, संगोपन करताना त्यांना आजच्या जगात सामावून घेणे, इतर मुलांप्रमाणे सामान्य जीवन देणे आणि आपल्यानंतर त्यांचे भविष्य सुखकर असावे इतक्याच या पालकांच्या अपेक्षा असतात. परंतु, त्या पूर्ण करताना अशा मुलांच्या पालकांना अनेक खडतर आव्हानांचा सामना करावा लागतो या सर्व बाबी लक्षात घेत ‘स्वनिकेतन’ या गृहसंकल्पनेचा जन्म झाला.
पश्चिम पुण्याच्या परिसरात सुप्रसिद्ध फॉरेस्ट ट्रेल्स या टाऊनशिपमध्ये या विशेष मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक गेटेड कम्युनिटी या स्वरूपात हा प्रकल्प असणार असून यामध्ये २ व ३ बीएचके स्वरूपाच्या एकूण २४० सदनिका असतील. या प्रकल्पातील सदनिका आता ग्राहकांना बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती शशांक परांजपे यांनी दिली.
स्वनिकेतन या प्रकल्पामुळे एकाच छताखाली आमच्या मुलांची सर्व व्यवस्था चोख होऊन त्यांचे संगोपन करणे हे पालक म्हणून आम्हालाही सोपे होईल. पालकांना विश्वासात घेऊन परांजपे स्कीम्स हा प्रकल्प करीत असून यामुळे आमच्या गरजांप्रमाणेच सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध असतील हा विश्वास आम्हाला आहे. या प्रकल्पाने मुलांसोबतच पालक म्हणून आम्हीही निश्चिंत असू असे मत स्वनिकेतन या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या आणि विशेष मुलांचे पालक असलेल्या सुचित्रा ठिपसे म्हणाल्या.
परांजपे स्कीम्स कन्स्ट्रकशन्स लि. च्या वतीने २००० साली अथश्री हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. यामध्ये जेष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेत पुण्यातील विविध भागात गृहप्रकल्पांची उभारणी करण्यात आली होती. आज या प्रकल्पांमध्ये ४००० हून अधिक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असून पुण्यामध्ये तब्बल १२ प्रकल्प तर पुण्याबाहेर बंगळूरू व बडोदा येथे प्रत्येकी १ प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित आहे.
लहान आजारपणानंतर अथवा शस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठ नागरिकांना देखभालीची आवश्यकता असते अशा वेळी त्यांचे कुटुंबीय दूर असताना त्यांना दररोज नर्सिंग, केअरटेकर, केअरगिव्हर यांकडून योग्य काळजी व वेळेवर रुग्णालयाशी संबधित सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘आस्था’ हा ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘असिस्टेड लिव्हिंग’ व संबंधित सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आलेला प्रकल्प परांजपे स्कीम्सच्या वतीने सुरु करण्यात आला. उतारवयात देखील एक अॅक्टिव्ह आयुष्य जगण्याच्या दृष्टीने साकारलेल्या ‘आस्था’ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासोबतच त्यांच्या निवासाची, जेवणाची, मनोरंजनाची व सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ही काळजी घेत असताना सर्वोत्तम दर्जाच्या सुविधांसोबतच प्रशिक्षित असे डॉक्टर्स, केअरटेकर हे देखील या ठिकाणी २४ तास उपलब्ध असतात. सध्या बावधन येथील ‘आस्था पेबल्स’ या ठिकाणी ‘आस्था बाय अथश्री’ आणि बाणेर पाषाण लिंक रोड येथे ‘आस्था’ कार्यान्वित असून याठिकाणी आज २०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जाते.
परांजपे स्कीम्स बद्दल
बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अशी परांजपे स्कीम्सची ओळख असून संस्थेच्या वतीने मागील ३५ वर्षांत निवासी आणि व्यावासिक अशा तब्बल २०० हून अधिक प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. निवासी गृहप्रकल्पांसोबत व्यावसायिक प्रकल्प, टाऊनशिप, एसईझेड, मॉल अशा विविध प्रकल्पांचा यांमध्ये समावेश आहे. परांजपे स्कीम्सचे प्रकल्प हे ९ शहरांमध्ये असून त्यांच्या वतीने २ कोटी स्केअर फूट इतके बांधकाम आजवर करण्यात आले आहे. व्यावसायिक गुणवत्तेसोबतच सामाजिक भान जपत संस्था कार्यरत असून आज अध्यक्ष असलेले श्रीकांत परांजपे आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या शशांक परांजपे यांनंतर पुढची तरुण पिढी संस्थेची घोडदौड समर्थपणे सांभाळत आहे.