Agriculture News: शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! केंद्र सरकारकडून ५५८ कोटींचा निधी मंजूर; पाहा कोणाला मिळणार लाभ
Agriculture News: सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण आणि सेंद्रिय शेतीला मिळणार गती; केंद्रीय आढावा बैठकीत महाराष्ट्राच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक.

Agriculture News – महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक आणि कृषी विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम-आरकेव्हीवाय) अंतर्गत केंद्र शासनाकडून दुसऱ्या हप्त्यापोटी ३३५ कोटींचा निधी राज्याला प्राप्त झाला असून, त्यामध्ये राज्य शासनाचा ४० टक्के पूरक हिस्सा २२३ कोटी मिळून एकूण ५५८ कोटींचा निधी राज्यातील कृषी विकासासाठी उपलब्ध झाला आहे.
या निधीमुळे राज्यातील विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीला मोठी चालना मिळणार असून, लाखो शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीच्या आरोग्याचे व्यवस्थापन, डिजिटल कृषी तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करत शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. कृषी योजनांतील निधीचा परिणामकारक वापर, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या कार्यपद्धतीबद्दल राज्याचे अभिनंदन करण्यात आले.
“केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला हा निधी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सूक्ष्म सिंचन, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि कृषी यांत्रिकीकरणाला यामुळे मोठी चालना मिळेल. राज्य शासन प्रत्येक रुपयाचा पारदर्शक व परिणामकारक वापर करून योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकरी हितासाठी दिलेल्या या भरीव सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती अधिक सक्षम करणे आणि कृषी क्षेत्र आत्मनिर्भर बनविणे, हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील.”
– दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.





