Mauni Mata: अयोध्येत भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी या चर्चेत आल्या आहेत. राम मंदिरासाठी त्यांनी मागच्या ३० वर्षांपासून मौन व्रत केले आहे. आता २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर त्या मौन व्रत सोडणार आहेत.
रामजन्मभूमीवर राम मंदिर उभे राहत नाही तोपर्यंत मौन व्रत पाळण्याचा निर्धार सरस्वतीदेवी यांनी केला होता. १९९२ साली बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली त्या दिवसापासून त्यांनी मौन व्रत धारण केले होते. त्यानंतर त्यांनी रामाची प्राणप्रतिष्ठापणा होईल तेव्हाच मौन व्रत सोडेल असा निर्धार केला होता. त्यानंतर आता तब्बल ३० वर्षांनंतर २२ जानेवारीला त्या व्रत सोडणार आहेत. त्यांचा आवाज न ऐकलेले कुटुंब त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत.
मौनी माता म्हणून ओळख
सरस्वती देवी यांना धनबाद जिल्ह्यात मौनी माता म्हणून लोकप्रिय आहेत. त्या आपल्या कुटुंबियांशी हातवारे करून आणि लिहून संवाद साधतात. मध्यंतरी त्यांनी मौन व्रतामध्ये थोडासा बदल केला होता. २०२० साली त्या रोज दुपारी एक तास बोलत असत. परंतु ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपून केले. तेव्हापासून त्यांनी पुन्हा दिवसभराचे मौन व्रत धारण केले.
अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठाची तारीख जाहीर झाल्यापासून त्या खूप आनंदी होत्या. या कार्यक्रमासाठी अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले आहे. त्यासाठी त्या हजर राहणार असल्याची माहिती सरस्वती देवी यांचा ५५ वर्षीय मुलगा हरेराम अग्रवाल यांनी पीटीआयशी बोलताना दिली.