Abhishek Sharma statement about IND vs AUS T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील भारताच्या 2-1 अशा विजयानंतर, सलामी फलंदाज अभिषेक शर्माने आपल्या धडाकेबाज कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीने भारताला केवळ मजबूत सुरुवात दिली नाही, तर त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’चा किताबही मिळाला. या यशानंतर अभिषेकने या आव्हानासाठी त्याने स्वतःला कसे तयार केले आणि या मालिकेमुळे त्याच्या कारकिर्दीला कसा नवा आत्मविश्वास मिळाला, हे मोकळेपणाने सांगितले. ‘मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या स्वतःला तयार केले’ अभिषेक शर्माने सांगितले की, त्याने ऑस्ट्रेलियातील परिस्थितीसाठी स्वतःला मानसिक आणि तांत्रिक अशा दोन्ही प्रकारे तयार केले होते. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळणे हे त्याचे नेहमीच स्वप्न राहिले आहे. तो पुढे म्हणाला, “मी या मालिकेची वाट पाहत होतो. जेव्हा मला कळले की आम्ही टी-20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जात आहोत, तेव्हा मी खूप उत्साहित झालो होतो. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत, मी पाहिले आहे की ऑस्ट्रेलियातील वातावरण फलंदाजीसाठी खूप अनुकूल आहे. म्हणून मी अशा प्रकारच्या गोलंदाजांसाठी आणि परिस्थितीसाठी स्वतःला तयार करू इच्छित होतो.” ‘चांगले क्रिकेट खेळायचे असेल, तर विश्वस्तरीय गोलंदाजांशी टक्कर घ्यावीच लागेल’ अभिषेकने सांगितले की, सरावाच्यावेळी त्याने स्वतःला विश्वस्तरीय मानल्या जाणाऱ्या गोलंदाजांसाठी तयार केले. चांगला क्रिकेटपटू बनण्यासाठी कठीण परिस्थितीतून जाणे आवश्यक आहे. अभिषेक शर्मा म्हणाला, “जर तुम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे असेल आणि तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करायची असेल, तर तुम्हाला विश्वस्तरीय गोलंदाजांना सामोरे जावेच लागेल. मी अशा प्रकारच्या गोलंदाजांसाठी सराव करत होतो, कारण याच मार्गाने तुम्ही एक खेळाडू म्हणून अधिक चांगले बनता.” हेही वाचा – Ranji Trophy 2025 : औकिब नबीचा रणजीत ‘कहर’! चार सामन्यात तिसऱ्यांदा ५ विकेट्स घेण्याचा केला पराक्रम ‘कर्णधार आणि प्रशिक्षकाने मोकळेपणाने खेळण्याचा आत्मविश्वास दिला’ भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले, असे अभिषेकने सांगितले. त्याने कर्णधार आणि प्रशिक्षकाचे आभार मानले, ज्यांनी त्याला स्पष्टता आणि आत्मविश्वास दिला. तो म्हणाला, “कर्णधार आणि प्रशिक्षकाने मला स्वतःला व्यक्त करण्याची स्पष्टता आणि आत्मविश्वास दिला. एक फलंदाज म्हणून, जेव्हा तुम्ही 20 किंवा 30 धावा करता, तेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही अधिक काळ खेळू शकता, परंतु संघासाठी खेळाची गती निश्चित करण्याच्या स्पष्टतेने मला खरोखर मदत केली.” हेही वाचा – PAK vs SA : निवृत्ती माघार घेतलेल्या क्विंटन डी कॉकचा मोठा धमाका! कोहली-विल्यमसनला मागे टाकत केला खास पराक्रम ‘लहानपणापासून वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहिले आहे’ अभिषेक शर्माने म्हटले की, ही मालिका त्याच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे आणि त्याने पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी स्वतःला पूर्णपणे तयार ठेवण्याचा संकल्प केला आहे. अभिषेक पुढे म्हणाला, “जर मला वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली, तर ते माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असेल. लहानपणापासूनच मी नेहमी भारतासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे मी त्या स्पर्धेसाठी तयार राहीन.”