पिंपरी, (प्रतिनिधी) – दिघी मधील आदर्शनगर येथे डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेला आणि खानावळ चालवणाऱ्यास चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 22) सायंकाळी घडली.
यशराज मधुकर कोळगे (वय 24, रा. आदर्शनगर, दिघी), एक महिला आणि दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 50 वर्षीय कामगार महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आदर्शनगर येथील एका खानावळीत काम करतात. त्या बुधवारी सायंकाळी खानावळीत काम करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी खानावळीचे मालक प्रकाश तेलगोटे यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.
हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपी महिलेने फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर आरोपींनी तेलगोटे यांच्या डोक्यात तर फिर्यादी यांच्या हातावर व पाठीवर झाऱ्याने मारून त्यांना जखमी केले.