नगर -करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून बाहेरगावाहून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होण्याच्या दृष्टीने ग्रामपातळीवर करोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार गावागावात ग्रामसुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गावचे सरपंच हे या समितीचे अध्यक्ष तर पोलीस पाटील सचिव आहेत. याशिवाय तलाठी आणि ग्रामसेवक हे यात सदस्य आहेत.परराज्यातील उसतोड कामगार, तसेच पुणे, मुंबई, व इतर जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी, भाविक पर्यटक हे ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास येत आहेत.
अशा बाहेरुन गावात वास्तव्यास येणाऱ्या व्यक्तींना परवानगी नसल्यास गावात प्रवेश दिला जात नाही. तथापी परवानी असल्यास तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे. बाहेरुन गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तींचे नाव व इतर सविस्तर तपशिल यांची नोंद सदस्य सचिव ठेवत आहेत. ज्या गावामध्ये पोलीस पाटील नाहीत त्या ठिकाणी ग्रामसेवक सदस्य सचिव म्हणून कामकाज बघत आहेत.
बाहेरुन गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तींसाठी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी येथे विलगिकरण कक्षात ठेवले जात आहे. आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत तात्काळ तपासणी करण्यात येत आहे. बाहेरुन गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तींचे पुढील 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक असून व तसे संबंधितांच्या हातावर शिक्के मारण्यात येत आहेत. सारी आणि करोना सदृश लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तींची माहिती तात्काळ तालुका कोव्हीड केअर सेंटर यांना कळविण्यात येत आहे.