नवी दिल्ली – खोटी आणि पोकळ आश्वासने देणाऱ्या भाजपला लोक कंटाळले आहेत आणि त्यांनी भाजपच्या विरोधात सपाला मत देण्याचा निर्णय घेतला आहे असा दावा समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यादव यांनी केला आहे.
होळीनिमित्त सैफई येथे पत्रकारांशी संवाद साधताना यादव म्हणाले, सर्वच जण भाजपला कंटाळले आहेत. महागाई, कर, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. भाजपने दिलेली आश्वासने खोटी आणि पोकळ ठरली आहेत. त्या आधारावर मतदार आपले मतदान करतील. जर आम्ही यूपी जिंकलो तर भाजपचा सफाया होईल, असेही ते म्हणाले.
समाजवादी पक्षाचे उर्वरित जागांवर उमेदवार लवकरच घोषित केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. आपण स्वत: बदायुॅंमधून निवडणूक लढवणार आहोत असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तथापि या बाबत पक्ष जे काही निर्देश देईल ते मी पाळेन, असे ते म्हणाले.
होळीच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना, यादव कुटुंबातील आणखी एक सदस्य आणि पक्षाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले, जसा भक्त प्रल्हादने होलिकाचा नाश केला, तसेच मतदारांनी आता दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेल्या सर्व वाईट गोष्टी दूर केल्या पाहिजेत.