देहूगाव, (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीपात्रामध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे आढळून आले आहे. विविध जातीच्या माशांसह महाशिर अर्थात देवमाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच विविध पर्यावरण संस्थानी धाव घेतली आहे.
देहूतील तीन मोठे ओढे व नाल्यांचे दूषित पाणी इंद्रायणी नदीपात्रामध्ये मिसळत असून नदीपात्रालगत असणारे सांडपाणी वाहून नेणारे अनेक चेंबरही फुटल्यामुळे नदी दूषित होत आहे. बीज सोहळ्यापूर्वी ही घटना घडली आहे. इंद्रायणी नदीपात्रात मृत झालेल्या माशांची माहिती मिळताच पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था, मायासे फाउंडेशन, पर्यावरणावर काम करणारी विविध संस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सोशल डेव्हलपरचे आरती डोळस, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, जीवित नदी फाउंडेशनचे प्रमुख शैलजा देशपांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नमामी इंद्रायणीचे सोमनाथ मुसुडगे, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांची पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालयाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. नैसर्गिक पद्धतीने सांडपाण्याचे निचरा कसा करता येईल, त्यावर वेगवेगळे उपाययोजना व प्रकल्प लवकर राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती विभागीय कार्यालयाचे डोळस यांनी दिली.
तीर्थक्षेत्र देहू येथे संत तुकोबांच्या दर्शनासाठी भाविक येतात. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसर होणार नाही, याची जबाबदारी देहू संस्थानची आहे. इंद्रायणीचे नदीपात्र आणि पाणी कायम स्वरूपी स्वच्छ रहाण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देहू संस्थान, देहू नगरपंचायत लोकप्रतिनिधी आणि शासन यांनी या समस्यांकडे गांभीर्यपूर्वक दृष्टीने पाहून यावर कायमची उपाय योजना करावी. – डॉ. सदानंद मोरे, श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज.
पालखी कार्तिकी अथवा बीज सोहळा आला की, प्रशासनाची नियोजन आढावा बैठका होतात. प्रत्येक वेळी दूषित पाण्याचा प्रश्न चर्चेला येतो. त्यावर ठोस उपाय झाली पाहिजे. सोहळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासन जागे होणार का? – डॉ. विवेक मोरे, संत तुकाराम महाराज वंशज