कामशेत, {चेतन वाघमारे} – वर्षातून एकदा ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त पाहुणे व मित्रमंडळींना बोलावून मांसाहारी शाकाहारी जेवणाचा बेत आखणे म्हणजे यात्रा. साधारणतः चैत्र महिन्याच्या सुरूवातीपासून ग्रामीण भागात यात्रांचा धूमधडाका सुरू झाला आहे. यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी पाहुणे व मित्रमंडळींची लगबग सुरू झाली आहे. यानिमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होत असून, छोट्या व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत.
यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने कलापथक, सोंगी भजन, रेकॉर्ड डान्स, मॅरेथॉन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांत काम करणाऱ्या कलाकारांना व खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. तसेच बैलगाडी, घोडागाडी शर्यतींचेही आयोजन केले जात असल्याने बैल व घोडागाडी पाळविणाऱ्या शर्यत शौकिनांना प्रोत्साहन मिळत आहे.
यात्रेनिमित्त कुस्ती मैदान आयोजित केले जात असल्याने कुस्ती कलेलाही प्रोत्साहन मिळत आहे. यात्रा म्हणजे सांस्कृतिक व सामाजिक उत्सव असून, ग्रामीण भागात आजही या उत्सवाची परंपरा कायम टिकून राहिली आहे.
यात्रेनिमित्त प्रत्येक गावात गावच्या ग्रामदैवताची, घरादाराची स्वच्छता करून रंगरंगोटी केली जात आहे. नोकरीनिमित्त पुण्या-मुंबईसह बाहेर असलेले ग्रामस्थ यात्रेनिमित्त आपल्या गावी परत येत आहेत. यात्रा धूमधडाक्यात साजरी करीत आहेत.
यात्रेच्या निमित्ताने खेळणी, आइस्क्रीम, विक्रेते, खाऊची दुकाने, लहान मुलांची खेळाची साधने गावात आणणाऱ्या व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत. मांसाहारामुळे बकरी विकणाऱ्या खाटिक समाजाची लाखोंची उलाढाल होत आहे. गावागावांत विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याने खेळाडूंनाही सरावाची संधी उपलब्ध होत आहे.
काही वर्षांपासून बैलगाड शर्यती बंद होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नियमांचे पालन करीत पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता गावागावांमध्ये या शर्यती पुन्हा सुरू झाल्या आहेत. यासाठी आयोजकांच्यावतीने लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जात आहेत. तसेच मंदिर आणि आसपासच्या परिसराला विद्युत रोषणाई देखील केली जाते.
खेळणीवाल्यांचा तीन दिवस मुक्काम
आता शहराच्या लगत अनेक ठिकाणी मनोरंजन पार्क उभे राहिले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या खेळण्याच्या राइड ठेवल्या आहेत. मात्र हजारो रुपये खर्च करून त्याठिकाणी जाणे प्रत्येकाला परवडत नाही. यामुळे ग्रामीण भागात आलेल्या उंच पाळण्यावर बसण्याचा आनंद लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वचजण लुटत असतात. ही खेळणी किमान तीन दिवस तरी यात्रा असलेल्या गावात असतात. काही ग्रामस्थ यासाठी खेळणीवाल्यांकडून देणगीही घेतात.