लोणावळा,{विशाल पाडाळे} : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीकडून खासदार श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. राज्यात महायुती सरकार यात शिवसेना आणि राष्ट्रवादी मधील फूट, बदलती राजकिय गणितं, बारणे यांच्या विरोधात तयार झालेली अँटी इनकंबेंसी, त्यामुळे हॅट्रिकसाठी बारणेंची गणित बिघडवू शकते. अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
अशात भाजपकडून मतदारसंघावर दावा केला गेला तर भाजपकडून खासदारकी लढवण्यास सक्षम असलेल्या उमेदवारांच्या यादीत अनपेक्षितपणे लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा आणि तडफदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या सुरेखा जाधव यांच नाव नागरिकांमधून पुढं येत ,मावळ लोकसभेची बीजपेरणी लोणावळ्यातून होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंव्हाही लागू होऊ शकते. यात एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यामध्येच मुख्य लढत होणार आहे. दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्ष मतदार संघासाठी तगड्या उमेदवारांचा शोध घेऊ लागले आहेत. भाजपने राज्यात मिशन ४५ हे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी जिंकून येण्याची क्षमता हाच प्राथमिक निकष लावला जाणार, हे नक्की. त्यामुळे मावळची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता असली तरीही भाजप या जागेवर ऐनवेळी दावा करू शकते.
यामध्ये भाजपकडून माजी मंत्री बाळा भेगडे तसेच पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच सक्षम महिला उमेदवार म्हणून लोणावळ्याच्या दोन वेळी नगराध्यक्षा असणाऱ्या सुरेखा जाधव यांचेही नाव पुढं येऊ लागले आहे. मावळ तालुक्यातील एक बेधडक, निडर महिला नेतृत्व आणि प्रशासनावर दरारा ठेवणाऱ्या, फायरब्रॅंड नेत्या म्हणून सुरेखा जाधव यांचे नाव पुढे येत आहे. त्यांनी लोणावळ्यात तीन टर्म नगरसेवक, २०११ मध्ये नगराध्यक्ष तर २०१६ मध्ये थेट जनतेमधून नगराध्यक्ष पद भुषविले आहे. लोकसभेसाठी त्यांचं नाव पुढं आल्यास तालुक्यात त्यांना मताधिक्य मिळू शकते, अशी चर्चा आहे.
मावळ लोकसभेत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण आणि पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सध्याचे पक्षीय बलाबल बघता याठिकाणी भाजपचे दोन अधिक भाजपला संलग्न असणारे अपक्ष एक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन तर शिवसेना शिंदे गटाचा एक असे आमदार आहेत. याशिवाय भाजपचा एक विधानपरिषद आमदारही मतदारसंघात आहेत.
विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटात असल्याने या जागेवर शिंदे गट दावा करणार हे निश्चित आहे. मात्र, कर्जत विधानसभा क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणी शिंदे गटाच्या ताकतीला मर्यादा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद मतदारसंघात दिसत असली तरी महायुतीच्या जागावाटपात त्यांना ही जागा मिळण्याची शक्यता धुसर आहे.
दुसरीकडे चिंचवड, पनवेल, मावळ आणि उरण या चार ठिकाणी भाजपची मोठी ताकत आहे. कर्जतमधून राष्ट्रवादीचे दोन वेळेचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेथेही भाजपची ताकत वाढली आहे. एकूणच राजकीय बळाचा विचार केल्यास मावळ लोकसभेत भाजपचे पारडे जड आहे.
शेवटची कोणाच्या पारड्यात उमेदवारी पडेल
राजकारणात कधी काय होईल याची शाश्वती नसते. राजकारणाच्या क्षितिजावर कधी कोणाचा उदय होईल आणि कोणाचा अस्त होईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. भाजप आपल्या धक्कातंत्राचा वापर करीत प्रस्थापितांना बाजूला सारून नवीन नाव पुढं आणून त्यांच्यावर राजकीय डाव खेळण्याचा हथकंडा आहे. मावळ लोकसभेसाठी पहिल्यांदाच महिलांना संधी देत भाजपने सुरेखा जाधव हा मावळ लोकसभेचा नवीन चेहरा बनल्यास आश्चर्य वाटायला नको.
मावळ विधानसभेत राष्ट्रवादीला घोडेमैदान मोकळं
महायुतीच्या जागावाटपात मावळ लोकसभेची जागा जर भाजपच्या वाट्याला आली तर विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा दावा बळकट होऊ शकतो. मावळ तालुका हा मागील अडीच दशक भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. हा बालेकिल्ला भेदण्यासाठी राष्ट्रवादीला भाजपच्याच मुशीत तयार झालेला मोहरा हाती घ्यावा लागला होता, हा इतिहास आहे. मात्र, बदलत्या राजकिय सारीपाटात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आल्याने याठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
भाजपने मावळाची सीट शिंदे गटाला सोडली तर विधानसभेची सीट देखील अजित पवार गटाला सोडावी लागेल. त्यामुळे भविष्यात पक्षाच्या ताकतीवर मोठा परिणाम होईल. आणि भाजप हे होऊ देणार नाही, हे नक्की. पण त्यासाठी त्यांना यातील एक तरी जागा लढवावी लागेल. लोकसभेची जागा भाजपच्या वाट्याला आली तर सुनील शेळके यांचा विजयी वारू दुसऱ्यांदा बिनदिक्कत चौफेर उधळू शकेल.