– विस्तार शिक्षण संचालक पाटील
राहुरी – भारतामध्ये औषधी व सुगंधी वनस्पतीचे महत्त्व पूर्वापार आहे. प्राचीन ग्रंथात औषधी वनस्पतींचा उल्लेख जागोजागी आढळतो. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या आजारांवर या औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधांचा वापर होत होता.
सध्या आधुनिक काळात जीवनशैली बदलल्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना तोंड देत आहोत. याला पर्याय म्हणजे सध्या भारतात उपलब्ध असलेल्या विविध जैविक वनस्पतींचे त्याचबरोबर औषधी व सुगंधी वनस्पतींचे संवर्धन करणे, त्यामध्ये अधिकाधिक संशोधन करून त्याचा प्रसार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, कालीकत (केरळ) येथील सुपारी व मसाला विकास निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ. सी. एस. पाटील बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव येथील अम्मा असोसिएशनच्या अश्वमेध ग्रुपचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, अमृत आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंदार भनगे, शेवगाव येथील आयुर्वेदिक कॉलेजच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. सगुना ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी कुलसचिव विजय पाटील, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. विक्रम जांभळे उपस्थित होते.