राजेंद्र वारघडे
पाबळ -शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवत आहेत. दररोज जनावरे व पिण्याच्या पाण्यासाठी साडेपाच ते सहा लाख लिटर पाण्याची गरज आहे. त्यासाठी 12 हजार लिटरच्या 12 टॅंकरची मागणी केली होती. मात्र, चारच टॅंकर उपलब्ध झाले आहेत. त्यातही ते टॅंकर नऊ हजार लिटर क्षमतेचे आहेत. यातून सोळा फेऱ्यातून दररोज दीड लाखाचे आसपास पाणी पुरवता येणे शक्य आहे. जनतेचा रोष मात्र ग्रामपंचायतीला घ्यावा लागणार आहे. टॅंकरची मागणी होत आहे.
पाबळकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन आणि राज्यकर्त्यांची भूमिका तोकडी पडत आहे. दररोज साडेपाच ते सहा लाख लिटर पाण्याची गरज असताना 12 हजार लिटरच्या 12 टॅंकरऐवजी चारच टॅंकर उपलब्ध केले जात आहेत. सध्या पाबळ परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महसूल प्रशासन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचा संबंधित विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे नागरिकांना लालफितीचा कारभार यंदाही अनुभवयास
येत आहे.
मतदारसंघात लोक”शाही’ रचना एकाच पक्षाकडे एकवटली आहे. मात्र, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजकीय मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी आपत्तीत याच लोकप्रतिनिधींना साकडे घातले जात आहे. अशावेळी ही आपत्ती दूर करण्याऐवजी राजकारण होत आहे. गाव व वाड्या- वस्त्यांना पाऊसमान कमी असल्याने पाणीटंचाईला पन्नास वर्षे तोंड द्यावे लागत होते, त्यात वीस वर्षांपूर्वी झालेल्या थिटेवाडी बंधाऱ्यात जलघट झाली आहे. मात्र, जानेवारीपासून बंधाराही कोरडा असल्याने तीन महिने धावाधाव करावी लागत आहे. हे वास्तव आहे. यावर तात्पुरती मलमपट्टीचा उपाय तोकडा पडत आहे.
लालफितीचा कारभार वर्षांनुवर्षे
पन्नास वर्षे टॅंकरचा प्रस्ताव देऊनही निर्णय उशिरा घेणे, टॅंकर कमी देणे, दिलेले टॅंकर कमी क्षमतेचे देणे, आदी प्रकार पाचवीलाच पुजले आहेत. टॅंकर सुरू करण्यासाठी गट विकास अधिकारीपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत चकरा मारणे हा प्रकार दरवर्षी होत आहे. किमान महिनाभर होरपळल्याशिवाय नागरिकांना पाणी मिळत नाही. मिळालेले पाणी अपुरे आहे. हे सर्व निमूटपणे सहन करण्याची वेळ आली आहे. यामागे विरोधी पक्ष असेल तर श्रेयवादाचा प्रकार होत असतो. काही ठिकाणी एकाच पक्षाचे खालपासून वरपर्यंत लोकप्रतिनिधी निवडून येऊनही वरपर्यंत दबाव टाकून टॅंकर लवकर मिळणार नाहीत, याची व्यवस्था केली जात आहे.