Pune News : देशभरात रंगणार ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने; नियोजनासाठी रविवारी पुणे विद्यापीठात कार्यशाळा
Pune News : पुण्यात पार पडणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी म्हणून देशभरात तब्बल ९९ एकदिवसीय साहित्य संमेलनांचा भव्य उत्सव रंगणार आहे.

Pune News : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी म्हणून देशभरात तब्बल ९९ एकदिवसीय साहित्य संमेलनांचा भव्य उत्सव रंगणार आहे. या ऐतिहासिक १०० व्या संमेलनाचा संदेश आणि मराठी साहित्याचा वारसा देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मराठी भाषिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. (Pune News)
या उपक्रमाच्या प्रभावी नियोजनासाठी आणि आयोजकांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी (दि. २६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली. (Pune News)
पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात २८ ते ३१ जानेवारी दरम्यान १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या ‘समर्थ युवा फाउंडेशन’च्या वतीने या ९९ संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. (Pune News)
यापूर्वी ज्या शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील ९९ ठिकाणी ही एकदिवसीय संमेलने होतील.
रविवारी सकाळी १० वाजता पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. (Pune News)
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) विविध शाखांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व आयोजक असे मिळून सुमारे १७० निमंत्रित या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. ही संमेलने येत्या १४ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत पार पडतील, अशी माहिती ‘मसाप’चे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली. (Pune News)
शंभरावे संमेलन लोकचळवळ बनवणार : राजेश पांडे
”शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जगभरातील प्रत्येक मराठी भाषिकापर्यंत पोहोचावे, हा आमचा मानस आहे. या माध्यमातून मराठीतील विविध बोलीभाषेतील साहित्य मुख्य प्रवाहात आणून ते वाचकांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. (Pune News)
या उपक्रमाद्वारे साहित्यिकांसोबतच तरुण, महिला, दलित, कामगार तसेच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, आयटी, उद्योग, नाट्य, कला आणि पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रांतील घटकांना साहित्याशी जोडले जाईल. समाजाच्या सर्व स्तरांतील साहित्य मुख्य प्रवाहात आणून शंभराव्या संमेलनाला खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
-राजेश पांडे (विश्वस्त, समर्थ युवा फाउंडेशन)





