अमाप खर्च करून बडी राष्ट्रे लष्करी तळ उभारत आहेत
नवी दिल्ली, दि. 30 – आंतरराष्ट्रीय कायदेपंडित संघाच्या 56व्या द्विवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना, पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, बडी राष्ट्रे पृथ्वीतलावरच्या नव्या नव्या भागात आपले लष्करी तळ स्थापन करीत आहेत व त्यासाठी अमाप साधन संपत्ती खर्च करीत आहेत, ही गोष्ट मोठी खेदजनक आहे. हे तळ भारताच्या शेजारीही आहेत. यामुळे जगातील संघर्ष मिटण्याऐवजी वाढीसच लागतील.
विरोधी पक्षाच्या स्वार्थी व दिशाभूल करणाऱ्या घोषणा
रोहटक – हरियाणातील प्रचंड किसान मेळाव्यापुढे भाषण करताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांतर्फे करण्यात येणाऱ्या निरनिराळ्या घोषणांवर कडक टीका केली. त्या म्हणाल्या, या घोषणांमुळे जनतेने फसू नये. त्यामुळे गैरसमजूत होईल, दिशाभूल होईल, हे विरोधी पक्ष विविध विचारसरणीचे आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच भ्रष्टाचारी आहेत,
हे सिद्ध झाले आहे.
भारत-रशिया व्यापार 100 कोटींनी वाढणार
नवी दिल्ली – भारत व रशिया यांचे दरम्यानचा व्यापार 1975 सालात 100 कोटी रुपयांनी वाढणार आहे. चालू साली तो 600 कोटी रु. इतका झाला. पुढील वर्षी रशिया भारताकडून 10 हजार टन कच्चा कापूस आयात करील. या उलट भारत रशियाकडून 10 लाख टन पेट्रोलजन्य पदार्थ मागवील. 10 लाख टन रॉकेल व 20 लाख टन डिझेल तेलही भारत आयात करणार आहे. याशिवाय खते, तांबे, जस्त, गंधक, सूर्यफुलाचे तेल व वृत्तपत्रीय कागद यांचीही आयात भारत करणार आहे.
अणुशक्ती साधनांचे भारताला साहाय्य
नवी दिल्ली – कॅनडाच्या पंतप्रधानांचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात येथे येतील व भारतीय नेत्यांबरोबर अणुशक्ती उत्पादनाची साधने पुन्हा पुरविण्याबाबत वाटाघाटी करतील. या प्रतिनिधीचे नाव इव्हान हेड आहे.
भारत व पोर्तुगाल करार
नवी दिल्ली – भारत व पोर्तुगाल यांचे दरम्यान राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासंबंधीचा एक करार झाला असून त्यावर उभय देशाचे परराष्ट्र मंत्री सह्या करतील.