धाराशिव : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काय असते? शिवसैनिक काय असतो? गद्दारांची जागा कशा पद्धतीने दाखवली जाते? हे आम्ही बंडखोरांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक आली काय आणि गेली काय? आम्हाला काही फरक पडत नाही. शिवेसना सत्तेसाठी जन्मलेली नाही. आमचे ब्रीद वाक्यच आहे की 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. 80 टक्क्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. अतिवृष्टी झाली आम्ही मदत केली. पाऊस पडला, काही ठिकाणी वाडी-वस्त्यांवर जाता येत नव्हते तर आम्ही स्वखर्चाने रस्ते केले, असे शिवसेनेचे नेते तानाजी सावंत म्हणाले. धाराशिव जिल्ह्यात आयोजीत एका मेळाव्यात ते बोलत होते. तानाजी सावंत म्हणाले, निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम करा, गद्दारी करायची नाही. जर गद्दारी केली तर त्याला ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे म्हणत त्यांनी बंडखोरी करणार्यांना कार्यकर्त्यांना इशारा दिला.