धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे विजेच्या धक्क्याने वडील, मुलगा आणि दोन मजुरांसह चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून, नळदुर्ग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील गणपत साखरे यांच्या शेतात विहिरीतील क्रेनच्या सहाय्याने मोटार काढण्याचे काम सुरू होते. मोटार काढत असताना क्रेनचा वरील भाग महावितरणच्या हायव्होल्टेज तारेला स्पर्श झाल्याने क्रेनमध्ये करंट उतरला. त्यामुळे, मोटार काढत असलेल्या चौघांचाही विजेच्या धक्क्याने जागेवरतीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. दुर्घटनेतील सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत आहेत. या घटनेत कासीम, कोंडिबा आणि त्यांचा 16 वर्षीय मुलगा रतन कासिम या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, रामलिंग साखरे यांच्यासह त्यांचे वडिल नागनाथ साखरे याही बापलेकााच दु्र्दैवी अंत झाला. दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले.