Pune-Solapur Highway: पुणे-सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा, प्रवाशांसह नागरिकांचा प्रशासनाविरोधात तीव्र संताप
Pune-Solapur Highway: राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ठेकेदाराला पाठीशी; मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप

हडपसर : पुणे-सोलापूर महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून सध्या हडपसर रविदर्शन ते कवडीपाट टोल नाका हे अंतर प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. पावसात खड्ड्यांमधून उडणाऱ्या पाण्याने तर पाऊस नसल्यास धुळीने प्रवाशांसह स्थानिक नागरिकही हैराण झाले आहेत. या मार्गावर वारंवार अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
सुमारे पाच किलोमीटर अंतराचा हा महामार्ग 20 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. मात्र, आता तो तिसऱ्यांदा उखडला आहे. सध्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. डांबराचा थर उडून त्याखालील बारीक खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. भरीस भर म्हणून पायलिंगचे खड्डेही वाहनचालक व पादचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहेत.
त्यातच बांधकाम व्यवसायिकांचा पदपथ व सेवावाहिनीवर पडलेला राडारोडा, पथारी व्यावसायिक, भाजीपाला व फळ विक्रेते यांचे पदपथासह थेट रस्त्यावरील अतिक्रमण आणि अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समिती समोर होत असलेली वाहनांची कोंडी यामुळेही महामार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार?
“गेली चार-पाच वर्षांपासून या मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना सांगत आलो आहे. मात्र, शाखा अभियंत्यापासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत कोणीही गांभीर्याने घेत नाही.रविदर्शन -हडपसर आकाशवाणी ते कवडीपाट दरम्यान रस्ता सुस्थितीत असताना कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पुन्हां डांबरीकरण केले. ते काम होत असतानाच निकृष्ट दर्जाचे काम केले गेले. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेट देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र,त्याकडे दुर्लक्ष केले.
काम केल्यानंतर अवघ्या पाच – महिन्यात पहिल्या पावसाळ्यात रस्ताच वाहून गेला.नंतर, तात्पुरती मलमपट्टी केली तीही दुसऱ्या पावसाळ्यात वाहून गेली आणि आत्तातर मोठं मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे.अधिकाऱ्यांना सामान्य प्रवाशांचे काहीही घेणे देणे नसून केवळ ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका निर्माण होत आहे.”- राहुल शेवाळे, माजी उपसरपंच, शेवाळेवाडी.
जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह
या रस्त्याच्या देखभाली बाबत महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर शाखा अभियंता अतुल सुर्वे यांना विचारले असता त्यांनी हा रस्ता आता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हस्तांतरित झाल्याचे सांगितले. तर, अद्याप हा महामार्ग आमच्याकडे हस्तांतरित झाला नसल्याचे एमएसआयडीसीचे प्रकल्प व्यवस्थापक उपअभियंता यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या या चालढकलीमुळे सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाकडे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“महामार्गाच्या या पाच किलोमीटरच्या भागात कधी खड्ड्यात पडून, कधी रेतीवरून घसरून तर कधी अतिक्रमणांच्या अडथळ्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. अधिकाऱ्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाहीत. कधी फोन घेतला तर उडवडीची उत्तरे दिली जातात. मात्र, मूळ रस्त्याच्या दुरावस्थेबाबत काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मोठे जन आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा राष्ट्रीय पाटील तालीम संघटनेचे अध्यक्ष उल्हास तुपे व क्रांती शेतकरी संघाचे अध्यक्ष अमोल तुपे यांनी दिला आहे.
Health Research: “फक्त तुमचा राग नाही, रागीट लोकांचाही सहवास धोकादायक! संशोधनातून धक्कादायक खुलासा”
“रस्त्यावर दिसणारे चौकोनी खड्डे हे एमएसआयडीसीच्या बोर टेस्टिंगमुळे निर्माण झाले आहेत. याबाबत संबंधित विभागाला दोन वेळा पत्राद्वारे कळविण्यात आले असून या रस्त्याचे कामही मंजूर झाले आहे. खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यालगत अनधिकृत रॅम्प उभारल्यामुळे गटारांमध्ये पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.
यापूर्वी हे रॅम्प काढून टाकण्यात आले होते, मात्र ते पुन्हा बांधले जात आहेत. शेवाळेवाडी फाटा परिसरातील काही लॉज व गृहनिर्माण सोसायट्यांकडून पार्किंगमधील पाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने समस्या वाढत आहे. यासंदर्भातील छायाचित्रे यापूर्वीच महानगरपालिकेला सादर करण्यात आली आहेत.”- अतुल सुर्वे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.
हेही वाचा:






