Workers Strike – केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहिता आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या आवाहनानुसार, कारखान्याच्या गेटसमोर निदर्शने करून केंद्र सरकारच्या धोरणांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनीधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी यावेळी कामगारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, केंद्रातील सरकार सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवत आहे. नवीन ‘लेबर कोड’ आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील अटींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसह सामान्य कामगारांवर मोठा अन्याय होणार आहे. या जाचक कायद्यांविरोधात देशातील दहा प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियन एकत्र आल्या असून, त्यांच्या या लढ्यात साखर कामगार पूर्ण ताकदीने उतरले आहेत. साखर कामगारांपासून ते बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या संपात सहभाग नोंदवला आहे. कारखाना गेटवरील सभेत कामगारांनी ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. नवीन कामगार संहितेमुळे कामगारांचे हक्क हिरावले जाण्याची भीती यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी जनरल मॅनेजर हनुमंत करवर, तात्यासो चोपडे, सतीश गावडे, सुहास निंबाळकर, संजय मुळीक, सागर निंबाळकर, नामदेव म्हेत्रे, विक्रम वाघ, दत्तात्रय यादव, अनिल जगदाळे, विलास पवार, अंबादास बनसोडे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.