भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जमिनीचे संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाने आज महत्त्वाचे पाऊल उचलले. कारखान्याच्या जागेच्या हद्दी अधिकृतपणे निश्चित करून, त्या ठिकाणी सिमेंटचे खांब (पोल) रोवण्यात आले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्याच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित होता. ३० हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना असून, कारखान्याची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी जागेच्या सीमा स्पष्ट असणे आवश्यक होते. भविष्यातील विस्तार आणि सुरक्षेच्या कारणास्तव, प्रशासनाने अधिकृत मोजणीनुसार हद्दी निश्चित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जमिनीचे सर्वेक्षण करून सीमांवर अधिकृत खुणा करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना अध्यक्ष जाचक म्हणाले, या मोहिमेमुळे कारखान्याच्या परिसरात प्रशासकीय शिस्त आणि मालमत्तेचे संरक्षण अधिक मजबूत होणार आहे. यावेळी संचालक शिवाजी निंबाळकर, अनिल काटे, निलेश टिळेकर, सतीश देवकाते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. कारखान्याची मालमत्ता ही सभासदांची आणि संस्थेची महत्त्वाची संपत्ती आहे. या जागेचे संरक्षण करणे आणि तिचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. या प्रक्रियेमुळे कारखान्याच्या जागेवर होणारी संभाव्य अतिक्रमणे रोखण्यास मदत होईल. पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती साखर कारखाना.