Women’s T20 World Cup 2024 (IND vs NZ) : न्यूझीलंडविरूध्द आम्ही सर्वोत्तम खेळ केला नाही – कर्णधार कौर

Women’s T20 World Cup 2024 (IND vs NZ) : – महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या लढतीमध्ये भारताला न्यूझीलंड संघाने ५८ धावांनी पराभूत केले. या पराभवाबद्दल लढतीनंतर बोलताना भारताची कर्णधार असलेल्या हरामनप्रीत कौरने निराशा व्यक्त केली. आम्ही सर्वोत्तम खेळ केला नाही. मात्र चांगले प्रदर्शन कारण्यासासाठी भारतीय संघ सक्षम असल्याचे तिने बोलताना सांगितले.
न्यूझीलंडने पहिल्या लढतीत निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद १६० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव १९ षटकांत १०२ धावांवर गारद झाला होता. या लढतीमध्ये भारताच्या एकाही फलंदाजाला २० धावा करता आल्या नाहीत. सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली की, आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाहीत, हे मान्य करावेच लागेल. अशा स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना महत्वाचा असतो, याची आम्हाला कल्पना असल्याचे तिने सांगितले.
दुबई येथील खेळपट्टी संथ असली तरी त्यावर १६१ धावांचे आव्हान अवघड असल्याने तिने मान्य केले नाही. ती म्हणाली, यापूर्वी देखील आम्ही १६०-१७० धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्याच प्रकारे आम्ही या लढतीत देखील आम्ही प्रयत्न करत होतो, मात्र फलंदाज टिकू शकले नाही आणि आमचे खेळाडू बाद होत गेले, त्यामुळेच आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, असे तिने बोलताना सांगितले.
भारतच विजय मिळवेल….
आज रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाल्याने या लढतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला विजयाची आवश्यकता आहे. दोन्ही गटातून सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. भारताच्या अजून तीन लढती शिल्लक आहेत. यामध्ये पाकिस्तान, श्रीलंका व विश्वकरंडक स्पर्धेचे माजी विजेते ऑस्टेलिया संघाचे आव्हान असणार आहे. पाकिस्तान संघाच्या लढतीबाबत कर्णधार हरमनप्रीतने पाकिस्तानविरुद्ध भारत विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला. या गटामध्ये आमच्या समोर मोठे आव्हान आहे. स्पर्धेत आमची अपेक्षित सुरुवात झाली नसली तरी, आम्हाला खेळाला पुढे घेऊन जायचे आहे, असे हरमनप्रीतने बोलताना सांगितले. पाकिस्तान संघाने पहिल्या लढतीमध्ये श्रीलंका संघाला पराभूत केले होते.





