Anil Parab : ‘ठाकरे बंधूं’ची युती होणार? अनिल परबांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण; म्हणाले ” आता आम्ही एक-एक पाऊल…”

Anil Parab : अवघ्या काही वेळात महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा वरळीतील डोम सभागृहात पार पडणार आहे. हिंदी सक्तीविरोधी शासन निर्णय मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह नसणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच सर्वच क्षेत्रातील लोकांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
ठाकरे बंधूंच्या या आवाहनाला साद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सभागृहाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सूचक विधान केले आहे.
ठाकरे बंधूंच्या एका सादेला मराठी जनतेने जो प्रतिसाद दिला, तो मराठी मनाच्या एकतेचा विजय आहे. आता आम्ही एक-एक पाऊल पुढे टाकत आहोत, असे सूचक विधान अनिल परब यांनी केले आहे.
पुढे काय होईल, हे वेळेनुसार निश्चित होईल, असे म्हणत अनिल परब यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या शक्यतेबाबत सूचक संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युक्तीविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल परब?
आजचा दिवस आमच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी मनाची एकजूट घडवली, त्याचसाठी आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यांसारखाच आजचा दिवस शिवसैनिकांसाठी मोठा सण आहे. ठाकरे बंधूंच्या एका सादेला मराठी जनतेने जो प्रतिसाद दिला, तो मराठी मनाच्या एकतेचा विजय आहे. आता आम्ही एक-एक पाऊल पुढे टाकत आहोत. आजचा दिवस हा पहिला टप्पा आहे. पुढे काय होईल, हे वेळेनुसार निश्चित होईल.
काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष?
या मेळाव्यात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या मेळाव्यासाठी अनेक बड्या नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आलेली आहेत. मेळाव्याच्या स्थळी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या मेळाव्यात सुरुवातीला राज ठाकरे यांचे भाषणा होणार असून त्यानंतर उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू काही सूचक संकेत देणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : “संकटाच्या काळात त्या लोकांना राज ठाकरे आठवतात, परंतु….”; अभिनेत्री तेजस्विनी पंडितने व्यक्त केला संताप





