नवी दिल्ली :– हिरे व्यापारी नीरव मोदी, आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी हे फरारी आरोपी आहेत. फरार झालेल्या त्यांच्या सारख्यांवरील टीकेने भाजपला यातना का होतात, असा उपहासात्मक सवाल कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला.
मोदी आडनावाविषयी केलेल्या टिप्पणीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. त्या खटल्यात राहुल यांना शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्या निर्णयाचे समर्थन करताना भाजपने मोदी आडनावाविषयी टिप्पणी म्हणजे इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) अवमान असल्याची भूमिका लावून धरली आहे. त्याचा आधार घेऊन खर्गे यांनी संकल्प सत्याग्रहात बोलताना भाजपवर पलटवार केला.
जनतेचा पैसा लुटून देशातून पळून जाणाऱ्यांकडे कुठल्या समाजाचे सदस्य म्हणून नव्हे; तर फरार आरोपी म्हणून पाहिले जावे, अशी भूमिका त्यांनी एकप्रकारे मांडली. देश वाचवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्तीला भाजपकडून शिक्षा केली जाते. मात्र, देशाला लुटणाऱ्यांना परदेशी पाठवले जाते, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.