Gopichand Padalkar & Jitendra Awhad : मंगळसूत्र चोर ते अर्बन नक्षल, पडळकर-आव्हाडांची दुश्मनी काय? विधानभवनात वादाची ठिणगी कशी पडली?

Gopichand Padalkar & Jitendra Awhad Clash : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या वादळी ठरत आहे. 16 आणि 17 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वैमनस्याने विधानभवनात तुंबळ राड्याला जन्म दिला.
या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, सर्वसामान्यांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दोन नेत्यांमधील दुश्मनी आणि त्याची सुरुवात कशी झाली, याचा सविस्तर आढावा घेऊया.
आव्हाड – पडळकर यांच्यात 2020 मध्ये वादाला सुरुवात
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वैमनस्याची ठिणगी पहिल्यांदा 2020 मध्ये पडली. गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर आव्हाड यांनी तीव्र आक्षेप घेत पडळकरांना कडक कारवाईची मागणी केली होती. पडळकरांनी प्रत्युत्तरात आव्हाड यांच्यावर “अर्बन नक्षल” असा शाब्दिक हल्ला चढवला होता. यामुळे दोघांमधील तणाव वाढला.
आव्हाड यांनी पडळकरांना अधिवेशनात डिवचले
2023 मध्ये पडळकरांनी पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करत “बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसाढवळ्या दरोडा टाकतात” असे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादीच्या नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा अनिता भामरे यांनी पडळकरांना “मंगळसूत्र चोर आणि पाकीटचोर” म्हणत प्रत्युत्तर दिले होते. हा “मंगळसूत्र चोर” हा शब्द पुढे आव्हाड यांनी अधिवेशनात पडळकरांना डिवचण्यासाठी वापरला. त्यांच्या या विधानाने वादाला आणखी तीव्रता आली.
2025 च्या अधिवेशनात आव्हाडांकडून “मंगळसूत्र चोर” घोषणाबाजी
2025 च्या पावसाळी अधिवेशनात हा वाद विकोपाला गेला. याची सुरुवात 16 जुलै रोजी झाली. आव्हाड यांनी विधानभवनाच्या गेटवर पडळकर यांच्याकडे पाहून “मंगळसूत्र चोर” अशी घोषणाबाजी केली. यावर पडळकरांनी संताप व्यक्त करत आव्हाड यांच्याशी शाब्दिक चकमक घडवली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
या घटनेचा परिणाम दुसऱ्या दिवशी (17 जुलै) विधानभवनाच्या लॉबीत दिसला, जिथे आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आव्हाड यांनी सभागृहात भाषण केल्यानंतर बाहेर पडताच पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यात कॉलर धरणे, शिवीगाळ आणि कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली. आव्हाड यांनी हा हल्ला नियोजित असल्याचा दावा करत, “मला मारण्याचा कट रचला गेला,” असे गंभीर आरोप केले.
नादाला लागला तर तू मेला, आव्हाडांना धमकी
17 जुलै रोजी आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्याकडून धमकीचे मेसेज आल्याचा दावा केला. त्यांनी लिहिले, “‘गोपी साहेबाच्या नादाला लागला तर तू मेला’, ‘तुझ्या अंगावर गाडी घालायला पाहिजे होती, पण साहेबांनी घातली नाही,’ अशा धमक्या आणि अश्लील शिवीगाळ मला मिळाली.” या पोस्टमुळे वाद आणखी चिघळला.
गोपीचंद पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त
हाणामारीच्या घटनेनंतर पडळकरांनी 18 जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे खेद व्यक्त केला. त्यांनी म्हटले, “आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली. विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येणारा हा विषय आहे. त्यांनी जी कारवाई करायची ती करावी. कायदा सर्वश्रेष्ठ आहे.” याच रात्री उशिरा या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला.
आव्हाड यांचे ठिय्या आंदोलन
या घटनेनंतर आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी पोलिसांच्या गाडीसमोर रात्रभर ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते. आव्हाड यांनी विधानभवनातील आमदारांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करत, “जर आमदारच सुरक्षित नसतील, तर आमदार होण्याचा काय उपयोग?” असा सवाल केला.





