Vijay Vadettiwar : राजकारणात कोणी कुणाचा कायमच शत्रू किंवा मित्र नसतो अशी जुनी म्हण आहे. त्यामुळेच निवडणुकीत राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. सध्या राज्यात नगपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. मात्र, ही निवडणूक स्थानिकची असल्याने विचित्र प्रकाराच्या युती आघाड्या झाल्याचे दिसत आहे. यानंतर लागणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी देखील जय्यत तयारी आत्तापासूनच केली जात आहे. मुंबई महापालिकेवर ‘कमळ’ फुलविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. पण महापौर कुणाचा होणार यावर चर्चा अधिक रंगली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असून, अशातच मनसेला सोबत घ्यायचे की नाही याविषयी दोन मतप्रवाह काँग्रेसमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेला सोबत घेण्यास विरोध दर्शवला आहे. पण काँग्रेस पक्षाचे बडे नेते विजय वडट्टेवारी यांनी मात्र, मनसेला सोबत घेण्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. मनसेशी आमची विचारधारा जुळत नाही. मात्र भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मनसे महाविकास आघाडीचा भाग होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक असून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती विजय वडट्टेवार यांनी दिली आहे. शरद पवार या आघाडीला घेऊन सकारात्मक असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. विजय वडट्टेवार यांचे सूचक विधान मनसेची आणि आमची विचारधारा जुळत नाही. त्यामुळे तो विषय आला असावा. पण शरद पवारांनी आपण आघाडीत लढलं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. आपण सर्वांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी, या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे मत विजय वडट्टेवार यांनी व्यक्त केले आहे. दोन दिवसांत बैठक? काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाने ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका कशी लढायची याबाबत दोन दिवसांत महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत सकात्मक चर्चा होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Yoga For Dry Skin: हिवाळ्यात त्वचा होतेय कोरडी? हे योगासन देतील नैसर्गिक ओलावा आणि ग्लो