Priyanka Chaturvedi : “आम्ही समाजवादी पक्षाच्या विरोधात बोललो नाही”; प्रियंका चतुर्वेदी यांचा खुलासा

Priyanka Chaturvedi – शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सोडल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सपाविरोधात बोललो नाही. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील जे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी विधान केले आहे. राज्यसभा निवडणुकीतही या नेत्यांनी पक्षहिताच्या पलीकडे जाऊन भाजपला पाठिंबा दिला होता. आताही शपथविधी सोहळ्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात वक्तव्ये केली असल्याचे चतुर्वेदी म्हटले आहे.
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, अखिलेश यादव पूर्णपणे इंडिया आघाडीसोबत आहेत. आम्ही आशा करतो की ते या विधानांकडे लक्ष देतील. भारतविरोधी ते आहेत ज्यांनी महागाई शिगेला नेली आहे, भारतविरोधी ते आहेत जे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर क्लीन चिट देतात. जॉर्ज सोरोसबद्दल बोलणे त्यांना शोभत नाही.
आम्हाला जनतेशी संबंधित समस्यांवर चर्चा करायची आहे. सरकार शेतकऱ्यांशी बोलत नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांनी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे, त्या सर्वांना सोबत घेऊन चालतात अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. एकप्रकारे ठाकरे पक्षाचा इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी ममता यांच्या नावाला पाठिंबाच असल्याचे यातून सूचित होते आहे.
दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सपाच्या महाराष्ट्र युनिटला भाजपची बी टीम म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या एका नेत्याने बाबरी मशिद पतनाच्या संदर्भात ६ डिसेंबरला सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे नेते चांगलेच भडकले होते व त्यांनी आम्ही यांच्यासोबत जाणार नसल्याची जाहीर प्रतिक्रियाही दिली होती.
त्यानंतर आदित्य यांनीही वरिल प्रतिक्रिया देत सपाच्या राज्यातील नेत्यांना लक्ष्य केले होते. मात्र आदित्य यांचे विधान सपाच्या प्रदेश शाखेविरूध्द होते, अखिलेश यादव यांच्या संदर्भात नव्हते असा खुलासा आता चतुर्वेदी यांनी केला.





