Pune District : तुळापूरमध्ये अवैध धंद्यांबाबत वर्षभरापूर्वीच दिलेला इशारा; ग्रामपंचायतीच्या पत्रांनंतरही ठोस कारवाईचा प्रश्न अनुत्तरित
Pune District : ग्रामपंचायतीच्या निवेदनात अशा प्रकारच्या अवैध धंद्यांमुळे तुळापूरसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती.

लोणीकंद : हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र तुळापूर येथे उघडकीस आलेल्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणानंतर एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. तुळापूर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांबाबत ग्रामपंचायतीने वर्षभरापूर्वीच संबंधित विभागांना लेखी निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. मात्र त्या मागण्यांवर नेमकी कोणती ठोस कार्यवाही झाली, याबाबत आता नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, तुळापूर ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी निवेदन सादर करून परिसरातील कथित अवैध जुगार अड्डे, मटका, देशी दारू विक्री, विनापरवाना हॉटेल व लॉजिंग व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर उपक्रमांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायतीच्या निवेदनात अशा प्रकारच्या अवैध धंद्यांमुळे तुळापूरसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच येथे येणार्या पर्यटकांना व शिवभक्तांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
या विषयावर ग्रामसभेतही चर्चा झाल्याचा उल्लेख करत संबंधित विभागांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. विशेषतः विनापरवाना सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची तपासणी करून त्यांच्यावर नियंत्रण आणण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, अलीकडील रेव्ह पार्टी प्रकरणानंतर या जुन्या पत्रव्यवहाराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी सूचना देऊनही त्यानंतर संबंधित विभागांनी नेमकी कोणती पावले उचलली, तपासणी करण्यात आली का, नोटिसा बजावण्यात आल्या का किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या का, याबाबत माहिती जाहीर करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या मते, प्रशासनाने वेळेत मिळालेल्या सूचनांकडे गांभीर्याने पाहिले असते तर काही प्रश्न आधीच नियंत्रणात आणता आले असते. त्यामुळे आता केवळ एका घटनेच्या तपासापुरते मर्यादित न राहता, पूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावरील कार्यवाही आणि प्रतिबंधात्मक यंत्रणेची परिणामकारकता याचाही सखोल आढावा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तुळापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांची भूमिका काय होती, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण येणे अपेक्षित असून नागरिकांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
ग्रामपंचायतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले का?
ग्रामपंचायतीने संबंधित विभागांना लेखी निवेदन देऊनही ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तक्रारींनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेळेवर कारवाई झाली असती तर अशा घटनांना आळा बसला असता का, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र या सर्व बाबींची सत्यता संबंधित विभागांच्या अधिकृत भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे.





