Wai Election Results – वाई तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालांनी तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. मतदारांनी दिलेल्या कौलातून विकास, स्थानिक नेतृत्व आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देत सत्ताधाऱ्यांना स्पष्ट संदेश दिल्याचे चित्र समोर आले आहे. एकूण चार जिल्हा परिषद गटांपैकी तीन गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले, तर एक गट भाजपकडे गेला. पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये राष्ट्रवादीने पाच गण जिंकत आघाडी घेतली असून भाजपने तीन गणांवर विजय मिळवला आहे.सोनगीरवाडी, वाई येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सोमवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. प्रत्येक फेरीअंती चुरस वाढत गेली. काही ठिकाणी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत निकाल अनिश्चित राहिले. दुपारपर्यंत सर्व गट व गणांचे निकाल स्पष्ट होताच तालुक्यात राजकीय वातावरण तापले. या निवडणुकीत बहुकोनी लढती असल्या तरी अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा अपेक्षित प्रभाव पडला नाही. थेट पक्षीय संघर्षातूनच बहुतांश निकाल लागले आहेत. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि जल्लोष करत आनंद व्यक्त केला. या निकालांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अध्यक्ष व सभापती पदांच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा; पण मताधिक्य घटले विधानसभा निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळूनही एकूण मताधिक्य घटल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, हा बदल भविष्यातील राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादीकडून मोठी सभा झाली नाही या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री आ. जयकुमार गोरे यांनी वाई तालुक्यात चार सभा घेतल्या. खा. उदयनराजे भोसले व मंत्री आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदयात्रा व प्रचार केला. राष्ट्रवादीकडून मदत व पुनर्वसन मंत्री आ. मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांनी सभा व पदयात्रा केल्या. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादीकडून मोठी सभा झाली नाही. सातारा जिल्हा परिषद निवडणूक जिल्हा परिषद : गटनिहाय निकाल यशवंतनगर गट – सहा उमेदवार रिंगणात असल्याने यशवंतनगर गटातील लढत अत्यंत अटीतटीची ठरली. शेवटच्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर महादेव शिंदे यांनी १,९३५ मतांच्या फरकाने विजय मिळवत बाजी मारली. दिनकर शिंदे यांना ११,२२९ मते मिळाली, तर भाजपचे रोहित मारुती वाडकर यांना ९,२९४ मते मिळाली. बावधन गट – बावधन गटात महिला उमेदवारांमध्ये थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋतुजा विराज शिंदे यांनी ३,७७७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांना १४,५५२ मते मिळाली, तर भाजपच्या दीप्ती शशिकांत पिसाळ यांना १०,७७५ मते मिळाली. ओझर्डे गट – ओझर्डे गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली ललित चव्हाण यांनी ८,६०८ मतांनी मोठा विजय नोंदवला. त्यांना १४,६४६ मते मिळाली, तर भाजपच्या दीपाली सागर जाधव यांना ६,०३८ मते मिळाली. भुईंज गट – भुईंज गटात मात्र चित्र वेगळे दिसले. चुरशीच्या लढतीत भाजपचे दिलीप ज्ञानोबा बाबर यांनी अवघ्या ८३३ मतांनी विजय मिळवला. त्यांना ११,३४५ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद भानुदास शिंदे यांना १०,५१२ मते मिळाली. पंचायत समिती : गणनिहाय निकाल अभेपुरी गण – राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत विठ्ठल डोंगरे यांनी २,७०९ मतांनी विजय मिळवला. त्यांना ६,०२९ मते मिळाली, तर भाजपचे अशोक नारायण मांढरे यांना ३,३२० मते मिळाली. यशवंतनगर गण – भाजपाचे स्वप्निल अशोक गायकवाड यांनी २,४४१ मतांनी विजय मिळवला. त्यांना ६,७४४ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय भिकू कांबळे यांना ४,३०३ मते मिळाली. शेंदूरजणे गण – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा लालसिंग जगताप यांनी ५,४६४ मतांनी स्पष्ट विजय मिळवला. त्यांना ९,०६७ मते मिळाली, तर भाजपच्या अनिता युवराज कोंढाळकर यांना ३,६०३ मते मिळाली. बावधन गण – बावधन गणात भाजपचे सचिन आप्पासो भोसले यांनी अवघ्या ३६७ मतांनी विजय मिळवला. त्यांना ६,३३० मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम सदाशिव पिसाळ यांना ५,९६३ मते मिळाली. केंजळ गण – राष्ट्रवादीचे शैलेश नामदेव सोपकाळ यांनी २,६०१ मतांनी विजय मिळवला. त्यांना ६,२०९ मते मिळाली, तर भाजपचे दीपक शिवाजी पवार यांना ३,६०८ मते मिळाली. ओझर्डे गण – राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा सुधीर फरांदे यांनी ४,२७० मतांनी विजय मिळवला. त्यांना ७,१९३ मते मिळाली, तर भाजपच्या अंकिता अभिजीत फरांदे यांना २,९२३ मते मिळाली. भुईंज गण – भाजपच्या सुरभी मदन भोसले यांनी ८९४ मतांनी विजय मिळवला. त्यांना ५,७२१ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या अॅड. शीतल प्रमोद वारागडे यांना ४,८२७ मते मिळाली. पाचवड गण – राष्ट्रवादी काँग्रेस राणी कांतीलाल पवार यांनी १,५५० मतांनी विजय मिळवला. त्यांना ६,५८८ मते मिळाली, तर भाजपच्या वनिता संतोष पवार यांना ५,०३८ मते मिळाली.