Wagholi News – पुणे-शिरूर उन्नत महामार्गावरील रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) दरम्यान होणार्या मेट्रो प्रकल्पाच्या अनुषंगाने शनिवारी (दि. 14) वाघोली परिसरात संयुक्त स्थळ पाहणी करण्यात आली. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पुढाकाराने ही पाहणी पार पडली. यावेळी महामेट्रो, पोलीस, एमएसआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तसेच महावितरण विभागाच्या अधिकार्यांनी उपस्थित राहून उड्डाणपूल व मेट्रोचे काम सुरू करताना कराव्या लागणार्या उपाययोजनांचा आढावा घेतला. रामवाडी ते वाघोली उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्प महामेट्रो आणि एमएसआयडीसी यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून वाघोलीच्या पुढे शिरूरपर्यंतचे काम एमएसआयडीसी करणार आहे. सुमारे 53.4 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये रामवाडी ते वाघोली दरम्यान उड्डाणपूल व मेट्रो उभारण्याचे महत्त्वाचे काम लवकरच सुरू होणार आहे. काम सुरू करण्यापूर्वी तसेच नंतर कराव्या लागणार्या उपाययोजनांच्या दृष्टीने संबंधित अधिकार्यांसोबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, पुणे वाहतूक पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव, एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंते व त्यांची टीम, पीडब्ल्यूडीचे अभियंते, महावितरणचे कार्यकारी अभियंते तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या भामा आसखेड (लोहगाव-वाघोली) पाणीपुरवठा योजनेच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. तसेच पीएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेबाबत कार्यकारी अभियंत्यांकडून माहिती घेत कामांच्या प्रगतीचा आढावा आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी घेतला. “मेट्रोचे काम करताना सेंटरपासून दोन्ही बाजूंना पाच मीटर अशी दहा मीटर जागा बांधकामासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी दोन लेन व पादचारी मार्ग ठेवावा लागेल. काम सुरू करण्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी लागणार आहे. साडे बारा किलोमीटरच्या या मेट्रो मार्गावर 11 स्थानके असतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून शक्य तितक्या कमी कालावधीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.” – अतुल गाडगीळ, संचालक – महामेट्रो “सध्या वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. मेट्रो व उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे नियोजन कसे करायचे, अंतर्गत रस्ते तसेच आरपी रोड तयार करून वाहतूक कशी वळवता येईल याबाबत नियोजन केले जात आहे. रुंदीकरणासाठी लागणार्या जागेबाबत मालकांना विश्वासात घेऊन मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाईल. स्थानिक नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून काम केले जाईल.” – ज्ञानेश्वर कटके, आमदार