मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुती धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. भाजप आणि शिंदेसेना या निवडणुका एकत्र लढवतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीचा भाग नसेल. सत्तावाटपाच्या वेळी अजित पवार त्यांना मान्य असतात, पण निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची धर्मनिरपेक्ष मते विभागण्यासाठी त्यांच्या पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास भाग पाडले जाते. ही एक सुनियोजित राजकीय रणनीती आहे आणि लोकांना याची जाणीव आहे. त्यांनी भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाते, परंतु निवडणुका जवळ आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला युतीपासून दूर ठेवण्यासाठी नवाब मलिक यांचा मुद्दा उपस्थित केला जातो. मुंबई भाजपचे प्रमुख अमित साटम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून मलिक यांना विरोध केला आहे. भाजप आणि शिवसेनेचा मुंबईत अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही असे म्हटले आहे. भाजप हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करून शिवसेनेला जवळ ठेवते. तर मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास भाग पाडते. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण केल्याशिवाय भाजप निवडणुका जिंकू शकत नाही, म्हणूनच निवडणुकीच्या वेळी असे वाद समोर येतात, असे ते म्हणाले. ओबीसी आरक्षणावर अनिश्चिततेचे सावट कायम वडेट्टीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत, पण जर हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले आणि ओबीसींच्या जागा रद्द झाल्या तर काय होईल? जर ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी झाले, तर याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न त्यांनी विचारला. ओबीसी आरक्षणावर अनिश्चिततेचे सावट कायम असल्याचे त्यांनी म्हटले.