Vidhan Sabha Elections 2024 – 20 नोव्हेंबर हा मतदानाच दिवस महाराष्ट्राचा भाग्य ठरवणारा दिवस आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये या महाराष्ट्रात आम्ही महायुती म्हणून केलेली कामे, विकासाची प्रकल्प आणि सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या जनतेसमोर आहेत. आम्ही लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठापर्यंत, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांना सत्तेचे वाटेकरी बनवले आहे. सत्ता ही सर्वसामान्य लोकांची आहे. या सत्तेमध्ये लोकांना योजनांचा वाटेकरी बनवून आम्ही या महाराष्ट्राला दाखवले आहे, दोन वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती जनता देईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र उद्योगामध्ये, पायाभूत सुविधांमध्ये, कल्याणकारी योजनांमध्ये नंबर एक केला आहे. त्यामुळे याचे फलित येणाऱ्या 20 नोव्हेंबरला गेल्या सव्वा दोन वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आणि मागच्या अडीच वर्षाचे सरकारच्या कामाचे नक्कीच मोजमाप होईल. गेल्या दोन ते सव्वा दोन वर्षांमध्ये कल्याणकारी योजना, विकासाच्या योजना पाहिल्या तर कधी न झालेला विकास आम्ही केला आहे. याची पोचपावती या महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने या निवडणुकीत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.